

अथणी : बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील सवदी गावचा सुपूत्र आणि शेतकरी कुटुंबातील बसवराज केंपवाडे याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) ‘भारतीय वन सेवा’ (आयएफएस-२०२५) परीक्षेत अखिल भारतीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळवून गाव, तालुका आणि राज्याची कीर्ती राष्ट्रीय स्तरावर उंचावली आहे.
सामान्य शेतकरी कुटुंबातील बसवराजने केवळ दुसऱ्याच प्रयत्नात अथक परिश्रमाच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. त्याच्या या अतुलनीय यशामुळे सवदी गावासह संपूर्ण परिसरात आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे. बसवराजने प्राथमिक शिक्षण सवदी येथे पूर्ण केले. त्यानंतर अथणी येथे पुढील शिक्षण घेत शिरसी येथील महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. पुढे बंगळूर येथे राहून त्याने यूपीएससी परीक्षेची कसून तयारी करीत यश संपादन केले.
बसवराजचे वडील दऱ्याप्पा केंपवाडे आणि संपूर्ण कुटुंब आपल्या सुपूत्राच्या यशामुळे आनंदित झाले आहे. गावकरीही बसवराजच्या स्वागतासाठी आतुर झाले आहेत. जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रम यांच्या बळावर ग्रामीण भागातील विद्यार्थीही यशाचे सर्वोच्च शिखर गाठू शकतात, हे बसवराजने आपल्या यशातून सिद्ध करून दाखवले आहे. त्याच्या या यशाबद्दल परिसरातून कौतुक होत आहे.