

अथणी : रायबाग तालुक्यातील जलालपूर येथे गूळ उत्पादन करणाऱ्या कारखान्याला अचानक आग लागून सुमारे ८ लाख रुपयांचे नुकसान झाले. वेळेत अग्निशामक दलाच्या पथकाने धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला.
जलालपूर येथील गावाबाहेरील दिलीप पवार यांच्या मालकीच्या गूळ कारखान्यात ही घटना घडली. काही मिनिटांतच आग संपूर्ण कारखान्यात पसरली. या आगीत गूळ, उसाचा कचरा, यंत्रसामग्री व इतर साहित्य जळून खाक झाले. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली.
सदर घटना रायबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. साखर कारखाने बंद झाल्यानंतर शेतकऱ्यांचा शिल्लक ऊस गूळनिर्मितीसाठी वापरला जात असल्याने अनेक गूळ कारखाने सुरू असतात. पण जलालपूर येथील या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.