

अथणी : मित्रांसोबत कालव्यात आंघोळ करण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अथणी तालुक्यातील अजूर गावाबाहेरील कालव्यात घडली. कुशीचंद्र राममनोहर बदाह (वय २३, रा. हातगाव, जि. फतेहपूर, उत्तरप्रदेश) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
कुशीचंद्र बदाह हा नोकरीच्या शोधात अथणी परिसरात आला होता. तो मित्रांसह अजूर गावाबाहेरील कालव्यात आंघोळ करण्यासाठी गेला होता. पोहता येत नसल्याने तो खोल पाण्यात जाऊन बुडाला. सदर बाब लक्षात येताच त्याच्या मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. पण यश मिळाले नाही.
घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शोधमोहीम राबवून तरुणाचा मृतदेह कालव्यातून बाहेर काढला. या घटनेची नोंद अथणी पोलिस ठाण्यात झाली असून पुढील तपास सुरू आहे.