Belgaum MLC Election : राज्यात सत्ता, बेळगावात तब्बल १३ आमदार, तरी भाजपचा दारुण पराभव ! | पुढारी

Belgaum MLC Election : राज्यात सत्ता, बेळगावात तब्बल १३ आमदार, तरी भाजपचा दारुण पराभव !

चिकोडी ; काशीनाथ सुळकुडे : अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या बेळगांव जिल्हा विधान परिषदेच्या निवडणूकीत काँग्रेस व अपक्षाने बाजी मारली आहे तर भाजपला पराभव पत्करावा लागला आहे. (Belgaum MLC Election)

चिकोडी शहरातील आर. डी. महाविद्यालयात आज विधान परिषदेच्या बेळगांव जिल्हा मतदारसंघाच्या निवडणूकीची मतमोजणी पार पडली. दुपारी १२.३० वाजता सुरू असलेली मतमोजणी सायंकाळी ४.४५ वाजता निकाल लागला.

काँग्रेस पक्षाचे उमेदवार चनराज हट्टीहोळी हे ३७१८ इतकी प्रथम प्राधान्याची मते घेऊन विजयी झाले. तर अपक्ष उमेदवार लखन जारकीहोळी हे दुसऱ्या प्राधान्याची २९७५ मते घेऊन विजयी झाले आहेत.

भाजपाचे उमेदवार महांतेश कवटगीमठ यांना २७८७ इतकी मते मिळाली असून १८८ मतांनी पराभूत झाले आहेत.

Belgaum MLC Election : जारकीहोळी बंधूंना ही निवडणूक प्रतिष्टेची

बेळगाव जिल्ह्यातील विधान परिषदेच्या दोन जागांसाठी झालेल्या निवडणूकीत काँग्रेस व भाजपा या राष्ट्रीय पक्षानी केवळ एकच उमेदवार दिला होता. पण यात अचानक लखन जारकीहोळी हे अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरले.

यामुळे तिरंगी लढतीत अत्यंत चुरशीची ठरली होती.

काँग्रेस, भाजपा या पक्षाना तर दुसरीकडे नेहमी सतेवर असणाऱ्या जारकीहोळी बंधूंना ही निवडणूक प्रतिष्टेची ठरली.

काँग्रेस पक्षाचे उमेदवार चनराज हट्टीहोळी हे बेळगांव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचे बंधू होत.

लखन जारकीहोळी हे भाजपचे नेते माजी मंत्री रमेश जारकीहोळी व कॉंग्रेस नेते सतीश जारकीहोळी यांचे बंधू होत.

यामुळे हट्टीहोळी याना निवडूण आणण्यासाठी कर्नाटक प्रदेश काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार, आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, सतीश जारकीहोळी यांनी कंबर कसली होती.

तर भाजपाने देखील चांगल्या प्रकारे प्रचारकार्य व रणनीती आखली होती.

स्वतः मुख्यमंत्री बसवराज बोमाई यांनी बेळगांवात प्रचाराला

स्वतः मुख्यमंत्री बसवराज बोमाई यांनी बेळगांवात येऊन उमेदवाराच्या प्रचारासाठी बैठका व सभा घेतली होती.

जारकीहोळी घराण्यात सतीश जारकीहोळी काँग्रेस पक्षात तर रमेश जारकीहोळी व भालचंद्र जारकीहोळी हे भाजपात आहेत.

यामुळे अपक्ष उमेदवार असलेल्या लखन जारकीहोळी यांच्या उमेदवारीचा भाजपा की काँग्रेसला नुकसान होणार याविषयी तर्कवितर्क व्यक्त केले जात होते.

पण आजच्या निकालानंतर भाजपचा उमेदवार कवटगीमठ पराभूत झाल्याने अपक्ष उमेदवार लखन यांच्यामुळेच भाजपाला जागा गमवावी लागली का, की भाजपातील अंतर्गत कलहामुळे पराभव झाला अशी चर्चा सुरू आहे.

राज्यात भाजपा सरकार व बेळगांव जिल्ह्यात १३ आमदार हे भाजपाचे असल्याने उमेदवाराचा पराभव पक्षाला आत्मपरिक्षण करावा लागणारा आहे.

Back to top button