

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अतिशय खालच्या स्तरावर जाऊन टीका केल्यानंतर भाजपने आक्रमक भूमिका स्वीकारली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना 'ईट का जवाब पत्थर से' देणार असल्याचा इशारा दिला आहे.
मंगळवारी (दि. ११) त्यांनी पत्रकार परिषदेतून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, 'उद्धव ठाकरे तुमचे संतुलन बिघडले असेल, तर मनोरुग्णालयात जा. नागपुरात मनोरुग्णालय आहे. तिथे जाऊन उपचार घ्या. परंतु, यापुढे फडणवीस यांच्याबद्दल बोललात तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही. आता रस्त्यावर आंदोलन केले, पुढील आंदोलनात आमचे लोक तुमच्या गाड्या अडवल्याशिवाय राहणार नाहीत. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला तुम्ही जबाबदार असाल, असा इशारा दिला.
देवेंद्र फडणवीस हे कर्तृत्वाचे धनी आहेत तर उद्धव ठाकरे हे कलंकित करंटा आहे, अशी टीका बावनकुळे यांनी केली. 'यापुढे तुम्ही पुन्हा असे काही बोललात तर नागपूरची जनता तुम्हाला जोड्याने बदडेल असा इशारा देखील त्यांनी दिला. ठाकरेंनी परिवाराचाच विचार केला. मराठा समाजाचे, ओबीसींचे आरक्षण घालविले. स्वत:च्या अहंकारासाठी जलयुक्त शिवार योजना बंद पाडली. कमिशन मिळत नसल्याने मेट्रो प्रकल्पाची कामे बंद पाडली. कोरोनाच्या काळात महाराष्ट्राला अंधारात लोटले.. अशी कलंकित कामे केली. फडणवीस यांनी आपल्या कर्तृत्वाने,अभिमानाने महाराष्ट्राचे नाव उंचाविले, स्वातंत्र्यवीरांचा अपमान करणाऱ्यांची साथ देणारे उद्धव ठाकरे कलंकित करंटे आहेत. नक्षलवादी, जिहादी आणि औरंग्यांच्या प्रेमात पडलेल्या लोकांना तरुंगात टाकणारा व्यक्ती देवेंद्र फडणवीस आहे. जिहाद्यांना नक्षलवाद्यांच्या मुव्हमेंटला संरक्षण देणारा त्याच्यावर कुठलीही कारवाई न करणारा कलंकित व्यक्ती उद्धव ठाकरे आहेत असा आरोप केला. यावेळी जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, शहर अध्यक्ष आ प्रवीण दटके आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस यांनी जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या बळावर नगरसेवक ते मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राच्या राजकारणात उच्चपदापर्यंत यशस्वी प्रवास केला. तर उद्धव ठाकरे यांनी स्वत:च्या नेतृत्वाला कर्तृत्व समजून जनतेशी बेईमानी करुन मुख्यमंत्रीपदापर्यंतचा अयशस्वी प्रवास केला.
– चंद्रशेखर बावनकुळे