Vishal Bajirao Ubale
मध्य प्रदेशातला भोपाल–जबलपूर राष्ट्रीय महामार्ग आज एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. हा रस्ता फक्त वाहनांच्या सोयीसाठी नाही, तर जंगलात राहणाऱ्या प्राण्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून तयार करण्यात आला आहे. हा महामार्ग वीरांगना दुर्गावती टायगर रिझर्व्हमधून जातो..
या भागात हरिण, नीलगाय आणि इतर वन्यप्राणी वारंवार रस्ता ओलांडतात. वेगात जाणाऱ्या मोठ्या गाड्यांमुळे अनेकदा प्राण्यांशी अपघात होत होते. यामुळे अनेक निष्पाप जीव आपला जीव गमावत होते आणि ही बाब प्रशासनासाठी मोठी चिंता बनली होती.
फक्त “स्पीड कमी ठेवा” असे फलक लावून काहीच उपयोग होत नव्हता. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि वन विभागाने या समस्येवर सखोल अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी ड्रायव्हरला आपोआप सावध करणारा एक वेगळा उपाय शोधून काढला.
या हायवेच्या सुमारे बारा किलोमीटरच्या संवेदनशील भागात, विशेषतः दोन किलोमीटरच्या पट्ट्यात, रस्त्यावर उंचावलेली लाल रंगाची खास मार्किंग करण्यात आली आहे. हा लाल थर साधा नसून रस्त्याच्या पृष्ठभागावर हलकी उंचावलेली लेयर आहे.
जेव्हा एखादी गाडी या भागातून जास्त वेगात जाते, तेव्हा चाकांखालून हलके व्हायब्रेशन जाणवते. त्यामुळे ड्रायव्हर आपोआप सतर्क होतो आणि गाडीचा वेग कमी करतो. यामुळे समोर प्राणी दिसल्यास गाडी थांबवण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो.
लाल रंग मुद्दाम निवडण्यात आला आहे, कारण तो धोका आणि सावधानतेचा संकेत देतो. हा रंग दूरूनच ड्रायव्हरला सांगतो की आपण आता वन्यजीवांसाठी संवेदनशील असलेल्या परिसरात प्रवेश करत आहोत.
इतकेच नव्हे, तर या संपूर्ण मार्गावर प्राण्यांसाठी पंचवीसपेक्षा जास्त अंडरपास तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे प्राणी रस्त्यावर न येता सुरक्षितपणे रस्त्याच्या पलीकडे जाऊ शकतात.
हा प्रकल्प भारतासाठी खूप महत्त्वाचा मानला जात आहे, कारण अशा प्रकारचा प्रयोग देशात पहिल्यांदाच करण्यात आला आहे.