पुढारी वृत्तसेवा
सिमेंटचे बांधकाम पूर्ण झाल्यावर सुमारे दोन आठवडे त्यावर पाणी मारणे महत्त्वाचे असते.
सिमेंट हे चुनखडी, चिकणमाती, वाळू, आयर्न ऑक्साईड आणि जिप्सम हे पदार्थ एकत्र करून रासायनिक प्रक्रियेतून बनवतात.
बांधकामासाठी जाड वाळू, तर कधी बारीक वाळू, सिमेंट आणि पाणी यांचं मिश्रण वापरतात. त्याला 'काँक्रीट' असे म्हणतात.
सिमेंट तयार करताना वापरलेल्या वेगवेगळ्या पदार्थामुळे सिमेंटमध्ये पाणी घातलं की खूप उष्णता निर्माण होते.
या उष्णतेमुळे काँक्रीटमधल्या पाण्याची लगेचच वाफ होते. पाणी निघून गेल्यामुळे, त्या ठिकाणी काँक्रीटमध्ये सूक्ष्म पोकळ्या निर्माण होवून काँक्रीटची मजबूती कमी होते.
काँक्रीटमधून पाणी निघून जाणं टाळण्यासाठी बांधकामावर सतत पाणी मारावे लागते.
बांधकाम ओल्या पोत्याने झाकून पोती कोरडी पडू नयेत म्हणून त्यांच्यावर सतत पाणी मारले जाते.
स्लॅबवर पाण्याचं तळं तयार करतात. बांधकामावरील कोणताही भाग हवेच्या संपर्कात येऊन त्यातील पाणी निघून जाणार नाही याची काळजी घेतली जाते.
बांधकाम झाल्यानंतरचा सुरुवातीचा काळ या प्रक्रियेसाठी महत्त्वाचा असतो, कारण काँक्रीटला त्याची ६५ ते ७० टक्के ताकद पहिल्या आठवड्यात प्राप्त होते.
बांधकामावर पाणी मारलं नाही तर काँक्रीटची मजबुती मोठ्या प्रमाणावर कमी होते.