India’s Last Road | भारताचा 'शेवटचा रस्ता' माहीत आहे का? जाणून घ्या ऐतिहासिक महत्त्व

पुढारी वृत्तसेवा

भारताच्या मुख्य भूमीचा शेवट जिथे होतो, तो हा रस्ता पर्यकांसाठी एक गूढ आणि विलोभनीय अनुभव ठरतो.

तामिळनाडू राज्यातील रामेश्वरमपासून धनुषकोडीकडे जाणारा आणि 'अरिचल मुनाई' येथे संपणारा राष्ट्रीय महामार्ग ८७ (NH 87) हा भारताचा शेवटचा रस्ता मानला जातो.

रामनाथपुरम जिल्ह्यात असलेला हा मार्ग एका बाजूला बंगालचा उपसागर आणि दुसऱ्या बाजूला हिंदी महासागर यांच्या मधून जातो.

धनुषकोडी हे एकेकाळी गजबजलेले शहर होते, जे आता ओसाड झाले आहे.

धनुषकोडीपासून पुढे NH 87 चा काही किलोमीटरचा पट्टा तुम्हाला थेट अरिचल मुनाई या वालुकामय टोकावर घेऊन जातो. हे पामबन बेटाचे दक्षिण टोक असून भारताच्या मुख्य भूमीपासून श्रीलंकेच्या सर्वात जवळचे ठिकाण आहे.

पौराणिक मान्यतेनुसार, प्रभू श्रीराम आणि त्यांच्या वानरसेनेने लंकेत जाण्यासाठी 'रामसेतू'चे बांधकाम याच ठिकाणाहून सुरू केले होते.

'धनुषकोडी' या नावाचा अर्थ 'धनुष्याचे टोक' असा होतो. असे म्हटले जाते की, रामाने आपल्या धनुष्याच्या टोकाने या पुलाची जागा निश्चित केली होती.

आधुनिक इतिहासात धनुषकोडी हे एक समृद्ध बंदर आणि रेल्वे स्थानक असलेले शहर होते. मात्र, डिसेंबर १९६४ मध्ये आलेल्या विनाशकारी चक्रीवादळाने संपूर्ण शहराचे अस्तित्व पुसून टाकले.

या दुर्घटनेनंतर सरकारने हे ठिकाण 'राहण्यायोग्य नाही' असे घोषित केले. आज तिथे केवळ उद्ध्वस्त इमारतींचे अवशेषशहराच्या गतवैभवाची साक्ष देतात.

धनुषकोडी येथील जुन्या पडक्या वास्तू या ठिकाणाला एक गूढ सौंदर्य प्राप्त करून देतात. येथून श्रीलंकेची सागरी सीमा अवघ्या १८ ते २० किलोमीटर अंतरावर आहे.

निसर्गाचे सौंदर्य आणि देशाच्या अगदी टोकावर उभे राहण्याचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक या ठिकाणी भेट देतात.

येथे क्‍लिक करा.