मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस ( सेना-राष्ट्रवादी ) यांची आघाडी जवळपास निश्चित झाली आहे. मुंबई काँग्रेसने मात्र स्वबळाचा हट्ट कायम ठेवल्यामुळे काँग्रेसला आघाडीत आणण्यासाठी शिवसेनेचे वरिष्ठ नेते दिल्लीतील काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात असल्याचे समजते.
मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक एकहाती जिंकणे शिवसेनेला तितकेसे सोपे राहिलेले नाही. फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे अवघे 84 नगरसेवक निवडून आल्यामुळे शिवसेनेने अर्ध्यापेक्षा जास्त मुंबई गमावली आहे. फेब्रुवारी 2012 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजप युती असतानाही भाजपचे अवघे 33 नगरसेवक निवडून आले होते. फेब्रुवारी 2017 मध्ये स्वतंत्र लढूनही भाजपने 82 नगरसेवक निवडून आणले होते. त्यामुळे मुंबईतील भाजपची ताकद वाढल्याचे दिसते. मुंबई महापालिकेतील सत्ता टिकवायची असेल तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेण्याशिवाय सेनेसमोर अन्य पर्याय नाही. मुंबईत राष्ट्रवादीचे 12 ते 13 नगरसेवक निवडून येतात. राष्ट्रवादी काँग्रेसलाही आपली ताकद वाढवण्यासाठी शिवसेनेच्या कुबड्यांची आवश्यकता आहे.
या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावरच लढण्याच्या भूमिकेवर मुंबई काँग्रेस ठाम आहे. कार्यकर्त्यांचे मनोबल कायम राखण्यासाठी कोणत्याही प्रकारची तडजोड करू नये, अशी विनंती मुंबई काँग्रेसने अखिल भारतीय काँग्रेस कमिटीला केली आहे. 2017 सालचा अपवाद वगळता 2002 सालापासून आम्ही कधी राष्ट्रवादी सोबत देखील युती केलेली नाही. सगळ्या निवडणुका आम्ही स्वबळावरच लढल्या आहेत. 2017 साली राष्ट्रवादीसोबत युती झाली होती. तेव्हा आम्हाला चांगला अनुभव आला नव्हता. त्यामुळे पुन्हा तो अनुभव काँग्रेस कार्यकर्त्यांना नको आहे, असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप म्हणाले. काही वर्षांत काँग्रेसची मुंबईतील ताकद कमी झाली असली तरी 2017 च्या निवडणुकीत शिवसेना, भाजप वरचढ असतानाही काँग्रेसचे 31 नगरसेवक निवडून आले. भाजपला शह घेण्यासाठी शिवसेनेला काँग्रेसचीही साथ आवश्यक वाटते.
माझे उद्धव ठाकरे यांच्याशी काही वैर नाही, असे मिश्कीलपणे सांगून राणे म्हणाले, तुम्ही या, उद्घाटन करा. पण हे आम्ही केलेय हे मान्य करा. माझे त्यांच्याशी तसं काही वैर नाही. पण काहीही न करता मिरवतात. उद्धव ठाकरे यांनी यावे. त्यांचे स्वागत आहे. वाटल्यास सिंधुदुर्गातल्या म्हावर्याचा पाहुणचार करू. पण श्रेय घेऊ नका, असा टोला राणे यांनी लगावला.
चिपी-परूळे येथील सिंधुदुर्ग विमानतळाचा लोकार्पण सोहळा शनिवार 9 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या सोहळ्यात केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ना.ज्योतिरादित्य शिंदे हे मुंबईहून दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होणार आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री उदय सामंत, खा. विनायक राऊत उपस्थित राहणार आहेत. रविवारपासून या विमानतळावरून नियमित प्रवासी सेवा सुरू होणार आहे.