सांगली ; विवेक दाभोळे : अवघ्या देशात द्राक्षपंढरी असा लौकिक असलेल्या सांगली जिल्ह्याचे जवळपास 30 टक्क्यांहून अधिक अर्थकारण द्राक्षावर अवलंबून आहे. मात्र, सातत्याने मागणी होऊन देखील जिल्ह्यात द्राक्ष संशोधन केंद्र होऊ शकलेले नाही. याबाबत आता लोकप्रतिनिधींनीच रेटा लावण्याची गरज आहे.
जगभरात भारताचा द्राक्ष उत्पादनात आघाडीचा क्रमांक आहे. देशभरात 1 लाख 45 हजार हेक्टर क्षेत्र द्राक्षाचे आहे. यातून साडेतीन हजार टनाचे द्राक्ष उत्पादन निघते. किमान 2 हजार 500 कोटींची द्राक्षे निर्यात होतात.
निर्यातीपैकी जवळपास 80 टक्के निर्यात महाराष्ट्रातून सांगली जिल्ह्यातून होते. खरे तर राज्यात सांगली, नाशिक, पुणे, अहमदनगर, सातारा, सोलापूर आणि उस्मानाबाद येथे द्राक्ष पिकाचे प्रमाण वाढत आहे.
प्रामुख्याने जिल्ह्यातील तासगाव, मिरज, पलूस, कडेगाव, आटपाडी, कवठे महांकाळ ही प्रमुख बेदाणा उत्पादक केंद्रे ठरत आहेत. बेदाणा उत्पादनासाठी थॉम्सन सीडलेस, माणिक चमन, सोनाका व तास – ए – गणेश या वाणांना मागणी राहते. द्राक्ष हे उच्च मूल्याचे पीक आहे. मात्र सातत्याने लहरी हवामान, अवकाळी पाऊस, धुके, विविध रोेगकिडी याचा सामना या पिकाला करावा लागत आहे. यातून द्राक्षासाठीचा खर्च वाढला आहे; तर उत्पादनात अस्थिरता राहिली आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने द्राक्ष पीक संशोधन केंद्र झाले तर यातून या पिकासाठी चांगला फायदा होऊ शकतो. द्राक्ष बागायतदारांना देखील यातून नवनवीन वाणांची द्राक्षे उपलब्ध होऊ शकतात. बेदाण्यांसाठी देखील अधिक संशोधन होऊन उत्पादकांना मार्गदर्शन होत गेले तर त्यातून अधिक चांगल्या गुणवत्तेचा बेदाणा तयार होऊ शकतो. एकूणच द्राक्ष शेतीचा व्याप आणि विस्तार, भविष्यातील संधी याचा विचार करून जिल्ह्यासाठी तातडीने द्राक्ष संशोधन केंद्र होणे गरजेचे आहे. पालकमंत्री जयंत पाटील, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी पाठपुरावा केला तर हे होऊ शकते, असे मत या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले.