Latest

पुणे …म्हणून वाढतेय उन्हाची काहिली

Arun Patil

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : झाडांचे कमी झालेले प्रमाण, वाढलेली कारखानदारी, त्यामुळे हवेत वाढलेला कार्बन डायऑक्साईड, वाहनांतील धुरामुळे वाढलेले प्रदूषण, याचबरोबर देशात मान्सूनपूर्व पावसाने दिलेली ओढ, जमिनीची वाढलेली धूप, पश्चिमी चक्रवात तयार न होणे, तसेच उत्तरेकडून वाहणारी गरम हवा यामुळे मार्च आणि एप्रिल महिन्यात देशभर उन्हाची काहिली वाढली.

यावर्षी देशात मार्च व एप्रिल हे दोन्ही महिने गेल्या 122 वर्षांत पहिल्यांदाच सर्वाधिक उष्णतेचे ठरले आहेत. या दोन्ही महिन्यांत मध्य भारतातील राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, महाराष्ट्र, झारखंड, उत्तराखंड्, तर उत्तर भारतातील हिमालयीन भागात उष्णतेचा कहर दिसून आला. याबरोबरच दक्षिण भारतातील तेलंगण, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक व केरळ या राज्यांनाही उष्णतेचा मोठा फटका बसला. उष्णतेच्या कडक लाटेमुळे संपूर्ण देशातील कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा 4 ते 5 अंशांनी वाढला होता. त्यामुळेच उष्णतेच्या लाटेने कहर केल्याचे दिसून आले.

र्याबाबत भारतीय हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी म्हणाले, एप्रिलपेक्षा मार्च महिना हा कडक उष्णतेच्या लाटेत गेला, तर एप्रिलमध्ये तापमान सरासरीच्या आसपास होते. तापमानवाढीची कारणे वेगवेगळी आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने देशात उत्तरेकडून मोठ्या प्रमाणात गरम हवा आली, तसेच मान्सूनपूर्व पाऊस पडलाच नाही. त्यामुळे जमिनीमधील तापमान सरासरीपेक्षा जास्त वाढले. हवेच्या वरच्या भागात तापमानाचे प्रमाण वाढले. सर्वात प्रमुख कारण म्हणजे मार्च व एप्रिल महिन्यात पश्चिमी चक्रावात चांगलेच वाढलेले असतात. त्यामुळे तापमान सरासरीच्या आसपास राहते. मात्र यावर्षी या महिन्यांत पश्चिमी चक्रावात तयार झाले नाहीत. त्यामुळे या महिन्यांत विक्रमी तापमानाची नोंद झाली.

म. फुले कृषी विद्यापीठाच्या कृषी

हवामान विभागाचे माजी प्रमुख व हवामानाचे अभ्यासक डॉ. रामचंद्र साबळे म्हणाले, हवेत गेल्या काही वर्षांपासून कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढले आहे. कार्बन डायऑक्साईड वातावरणात उष्णता धरून ठेवतो. त्यामुळे तापमान वाढते. ग्लोबल वॉर्मिंगमुळे हवामानातही बदल झाले.

वातावरण बदलात वृक्षतोड या बाबीचा मोठा वाटा आहे. वृक्षतोडीमुळे कमाल तापमानात वाढ झाली. गेल्या काही वर्षांत आशिया खंडात 55 दक्षलक्ष हेक्टर क्षेत्रावरील झाडे तोडली, तर आफ्रिका खंडातील 65 दक्षलक्ष हेक्टर क्षेत्रातील झाडे नागरिकांनी नष्ट केली. लॅटिन अमेरिकेत 85 दक्षलक्ष हेक्टरवरील झाडे पूर्णपणे तोडली गेली. जगातील एकूण 400 दक्षलक्ष हेक्टर जंगल गेल्या काही वर्षांत नेस्तनाबूत झाले. अजूनही दरवर्षी जगातील दहा लाख हेक्टर क्षेत्रावरील झाडे तोडली जातात. या कारणांमुळे देशासह जगात तापमान वाढ होत आहे.

2030 पर्यंत हवामानात मोठे बदल शक्य

महाराष्ट्रातील 33 टक्के जमिनीवर सध्या केवळ 17 टक्के जंगल उरले आहे. याबरोबरच वाढलेली कारखानदारी, वाहनांमधून बाहेर पडणारा धूर, त्यामुळे हवेत वाढलेले प्रदूषण या कारणांमुळेही देशात यावर्षी सर्वाधिक तापमानात वाढ झाली आहे. 2030 पर्यंत हवामानात आणखी विविध बदल घडून येण्याची शक्यता आहे. त्यामध्ये अचानक पावसाचे प्रमाण कमी होणे, दुष्काळ पडणे, चक्रीवादळाचे प्रमाण वाढणे, थंडी सरासरीपेक्षा जास्त पडण्याची शक्यता आहे. यामुळे जंगलातील प्राण्यांबरोबरच मानवी वस्त्यांनाही धोका पोहोचण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT