file photo 
Latest

पुणे : मान्सून ५ दिवस आधीच पोहोचणार अंदमानात

मोनिका क्षीरसागर

पुणे : पुढारी वृत्तसेवा
बंगालच्या उपसागरात 'असनी' चक्रीवादळ शमताच कमी दाबाचे पट्टे तयार झाल्याने मान्सूनची वाट सुकर झाली आहे. यामुळे दक्षिण अंदमान व बंगालच्या उपसागरात १५ मे रोजीच म्हणजेच ५ दिवस आधीच मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.

दरवर्षी १८ ते २०  मेदरम्यान मान्सून अंदमानात दाखल होत असतो. मात्र, अनुकूल स्थितीमुळे तो पाच दिवस आधीच येण्याची शक्यता आहे. 'असनी' चक्रीवादळाचा प्रभाव कमी होताच बंगालच्या उपसागरात बुधवारी सायंकाळी कमी दाबाचा पट्टा तयार झाला. या पट्ट्याचे १२ मे रोजी तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर झाल्यामुळे आंध्रप्रदेश व रायलसीमाच्या किनारपट्टीवर अतिवृष्टी होत आहे. वार्‍यांचा वेग किनारपट्टीवर ताशी ४० ते ५० किलोमीटर आहे. या सर्व घडामोडींमुळे मान्सूनचे आगमन सुकर झाले आहे. यामुळे यंदा हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजापेक्षाही पाच दिवस आधीच मान्सून या भागात दाखल होणार आहे.

काही ठिकाणी मुसळधार

या अनुकूल स्थितीमुळे तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, केरळ, लक्षद्वीप यासह ईशान्य भागातील नागालँड, मिझोराम, त्रिपुरा या भागांतही पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस बरसेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मात्र, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, जम्मू-काश्मीर, दिल्‍ली, महाराष्ट्रातील विदर्भ या भागांत 16 मेपर्यंत उष्णतेची लाट कायम राहील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT