मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : वरळी बीडीडी चाळीतील रहिवाशांप्रमाणे नायगाव बीडीडी चाळीतील रहिवाशांचे मोठ्या घराचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. या चाळीतील पात्र रहिवाशांना 500 चौरस फुटाची सदनिका मिळणार आहे.
पोलिसांच्या घरांबाबतही सकारात्मक निर्णय झाला असून पुढील आठ दिवसात त्याबाबत शासन निर्णय काढण्यात येणार आहे. गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी नायगाव बीडीडी चाळीला भेट दिली. त्यानंतर पुनर्वसन प्रकल्पासंदर्भात त्यांनी ही घोषणा केली.
जानेवारी 2021 पर्यंत जे नागरिक राहत आहेत ते सर्वजण सदनिका मिळण्यास पात्र आहेत. सरकार कोणालाही बेघर करणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.
त्याचबरोबर चाळ पुनर्वसन प्रकल्पाचे काम सुरू करण्याच्या निर्णयावर सरकार ठाम असून कोणीही प्रकल्पात अडथळा आणू नये असे आवाहनही त्यांनी केले.
पुढील दहा दिवसात पहिल्या चार इमारतींचे काम सुरू करण्यात येणार असून सुमारे 400 लोकांचे स्थलांतर बॉम्बे डाईंग मिल मधील इमारतींमध्ये करण्यात येईल. ज्या लाभार्थींना तिथे जायचे नसेल त्यांना सरकारतर्फे 22 हजार रुपये प्रतिमाह भाडे देण्यात येईल.
देखभाल दुरुस्तीचा समावेश करारात करणार
इमारतींच्या देखभाल – दुरुस्तीचा समावेश करारात करण्यात येणार आहे तसेच पात्र – अपात्रते संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी हे सक्षम प्राधिकारी असतील असेही आव्हाड यांनी स्पष्ट केले. यावेळी आव्हाड यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच रहिवाशी यांच्याशी पुनर्वसन प्रकल्पासंदर्भात संवाद साधला व रहिवाश्यांच्या शंकांचे निरसन केले.
तसेच स्थानिक रहिवासी आणि लोकप्रतिनिधींना शासनास सहकार्याचे आवाहन केले. नायगाव बीडीडी चाळीमध्ये 41 इमारती असून 3 हजार 344 सदनिकांची निर्मिती करण्यात येणार आहे.