Latest

नाना पटोले : धारावी प्रकल्पात ८०० कोटींचा घोटाळा?

Arun Patil

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : धारावी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या 45 एकर जमिनीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने रेल्वेला 800 कोटी रुपये दिले. परंतु, आजपर्यंत राज्य सरकारला जमीन मिळालेली नाही आणि 800 कोटी रुपयेही परत मिळाले नाहीत. या घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

विलासराव देशमुख यांचे सरकार असताना धारावीचा चेहरामोहरा बदलण्यासाठी पुनर्वसन प्रकल्पाची योजना मांडली होती.परंतु,काही कारणाने ती कार्यान्वित होऊ शकली नाही. ही योजना फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने सुरू केली. फडणवीस सरकारने रेल्वेला 800 कोटी रुपये जमिनीसाठी दिले. मात्र आजपर्यंत त्या योजनेचे काम पुढे गेले नाही. जमीनही मिळाली नाही आणि पैसेही परत आलेले नाहीत, असे पटोले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

त्या 800 कोटींचे काय झाले? योजना का फसली? जनतेचे पैसे रेल्वेला दान करण्याचा अधिकार फडणवीस यांना कोणी दिला? याची चौकशी एसआयटीमार्फत करावी. हवे तर, ईडी व सीबीआय चौकशीसाठीही शिफारस करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. हा प्रश्न विधिमंडळ अधिवेशनातही उपस्थित करणार आहोत,असे नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

रश्मी शुक्लांवर 500 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा ठोकणार

रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीरपणे माझे फोन टॅप केले. अमली पदार्थांच्या व्यापाराशी माझा संबंध लावला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यात तत्कालीन मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सहभाग असल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. सध्या मुख्य आरोपी रश्मी शुक्ला असल्याचे समोर आले आहे. माझा फोन टॅप झाल्याचा मुद्दा विधानसभेतही उपस्थित केला होता. या प्रकरणी रश्मी शुक्ला आणि संबंधित व्यक्तींवर 500 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा ठोकणार आहे, असे पटोले यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT