कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
महाविकास आघाडी आणि भाजप यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीसाठी आज मंगळवारी (दि. 12) मतदान होत आहे. दुपारी १ पर्यंत ३४.१८ टक्के मतदानाची नोंद झाली होती. दरम्यान, शिवाजी पेठेतील ८ नंबर शाळेजवळ भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने दुपारी गोंधळ झाला. भाजपच्या वतीने जय श्रीराम तर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देण्यात आल्या. यामुळे या ठिकाणी वातावरण तंग बनले होते.
काँग्रस उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी आयर्विन ख्रिश्चन हायस्कूलमधील मतदान केंद्र क्रं 139 या ठिकाणी मतदान केले.
प्रचारासाठी दोन्ही बाजूंनी उतरलेल्या नेत्यांच्या फौजा आणि आरोप-प्रत्यारोपाच्या धुरळ्याने कमालीच्या गाजलेल्या या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव आणि भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांच्यात चुरस असली तरी पालकमंत्री सतेज पाटील आणि माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
मतदानाला सुरुवात…
राजारामपुरी 7 वी गल्ली येथील बूथवर लावलेला मांडव काढण्यास पोलिसांनी सांगितले, त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला.
प्रायव्हेट हायस्कूल येथील मतदान केंद्रावर मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी जात असताना दिव्यांग मतदार
दिव्यांग व्यक्तीला मतदानासाठी नेताना कार्यकर्ते
शिवाजी पेठ प्राथमिक शाळा क्रमांक आठमधील मतदान केंद्रावरील गर्दी
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोट निवडणुकीसाठी कोल्हापूर महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे व जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी कसबा बावड्यातील लाईन बाजार येथील महानगरपालिकेच्या भाऊसो महागावकर शाळा या केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.
उभा मारूती मंदिर चौकात परस्पर विरोधी गटाचे कार्यकर्ते केंद्रावर
महाविकास आघाडी आणि भाजप यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी (दि. 12) मतदानाला सुरुवात झाली. प्रचारासाठी दोन्ही बाजूंनी उतरलेल्या नेत्यांच्या फौजा आणि आरोप-प्रत्यारोपाच्या धुरळ्याने कमालीच्या गाजलेल्या या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव आणि भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांच्यात चुरस असली तरी पालकमंत्री सतेज पाटील आणि माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
मंगळवारी (दि. 12) सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान होत आहे. महाविकास आघाडी आणि भाजपसह अन्य पक्ष व अपक्ष अशा एकूण 15 उमेदवारांचे भवितव्य मंगळवारी मतदान यंत्रात बंद होणार आहे. सोमवारी दिवसभर पायाला भिंगरी बांधलेल्या कार्यकर्त्यांनी रात्रही अक्षरश: जागवली. टोकाला गेलेली ईर्ष्या, राज्यभरातील नेत्यांची हजेरी आणि आरोप-प्रत्यारोपांनी मोठी चुरस निर्माण झाली आहे. यामुळे मतदारांतही उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता आहे.
मतदारसंघातील वातावरणाचा अंदाज घेत ज्या ज्या ठिकाणी उमेदवार मागे आहे, त्या त्या ठिकाणी जे जे करायला लागेल ते करत अशा मतांची जुळणी करण्यासाठीचे प्रयत्न सुरू होते. मतदारसंघाची परिसर, प्रभागनिहाय विभागणी करून त्या त्या भागाची जबाबदारी पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्त्यांवर निश्चित करण्यात आली आहे. काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली आहे. यामुळे महाविकास आघाडीने ही जागा काँग्रेसला दिली आहे. हक्काची जागा कायम ठेवण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. त्याला महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी साथ दिली आहे. भाजपने ही जागा जिंकण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आहेत. मंगळवारी 357 मतदान केंद्रांवर मतदान होईल.