Latest

औरंगाबाद : नहर-ए- अंबरी, नहर-ए-पाणचक्कीला हेरिटेजचा दर्जा

मोहन कारंडे

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : देशभरातील वॉटर हेरिटेज स्थळांची घोषणा शुक्रवारी (दि. ६) केंद्र शासनाने केली. यात औरंगाबाद शहरातील ४०० वर्षे जुन्या नहर-ए- अंबरीची आणि नहर-ए-पाणचक्कीची नोंद घेतली आहे. देशभरातील ७५ जलसाठ्यांमध्ये या दोन नहरींचा समावेश करण्यात आला आहे.

१७ व्या शतकात म्हणजेच १६१२ मध्ये मलिक अंबर यांनी आपल्या अधिपत्याखालील औरंगाबाद शहरातील नागरिकांना मुबलक पाणी उपलब्ध व्हावे, त्यांना पाणीटंचाईची झळ पोहोचू नये. यासाठी 'सायफन' पद्धतीचा वापर करून 'नहर-ए-अंबरी' नावाची पाणीपुरवठा योजना आखली होती. कोणत्याही अभियांत्रिकी, तंत्रज्ञानाची जोड नसताना मनुष्यबळाच्या साहाय्याने खाम नदीच्या उगमस्थानी प्रथम पाणी अडविण्यासाठी तलाव बांधण्यात आला. त्याच्या भिंतींसाठी विटा आणि चुन्याचा वापर केला गेला. या तलावातील साठवलेले पाणी सुमारे चार मैल अंतरावरील ऐतिहासिक मकबरा वास्तूपर्यंत आणण्यासाठी 'नहरी' म्हणजेच कालव्याचा मार्ग खोदून ते पाणचक्कीपर्यंत आणले गेले. त्यावेळी शहराला पाणीपुरवठा करणारी योजना अस्तित्वात आणली.

शहराच्या चोहोबाजूंनी असलेल्या डोंगरांमधून नहर (कालवा) खोदून त्यामार्फत पाणी योजना राबवली होती. ऐतिहासिक औरंगाबाद शहरातील ४०० वर्षे जुन्या नहर-ए- अंबरी, नहर-ए-पाणचक्कीची केंद्र सरकारच्या जलशक्ती मिशन मंत्रालयाने नोंद घेतली आहे. देशभरातील ७५ जलसाठ्यांमध्ये या दोन नहरींचा समावेश करण्यात आला आहे. २०२१ मध्ये तत्कालीन प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी औरंगाबादेतील नहरींचा केंद्र शासनाने जलशक्ती मिशनमध्ये समावेश करावा, यासाठी पाठपुरावा केला होता. विद्यमान प्रशासक डॉ. अभिजित चौधरी आणि त्यांच्या टीमने यासाठी केंद्राकडे विविध माहिती सादर केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT