Latest

‘असनी’ चक्रीवादळ : ओडिशात 6 बोटी बुडाल्या; आंध्रात 23 विमाने रद्द

Arun Patil

भुवनेश्वर/अमरावती ; वृत्तसंस्था : 'असनी' चक्रीवादळ यामुळे मंगळवारी समुद्रात उंचच उंच लाटा उसळत होत्या. इशार्‍यानंतरही समुद्रात गेलेले मच्छीमार गडबडीतच किनार्‍यावर परतले. ओडिशातील गंजम जिल्ह्यात 6 बोटींमधून सकाळी 60 मच्छीमार केवळ सुदैवाने समुद्रातून परतू शकले. समुद्रात यादरम्यान मोठा अपघात झाला. या सर्व 6 बोटी बुडाल्या; पण वेळीच परतीचा अलर्ट मिळाल्याने प्राणहानी टळली.

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. ओडिशा तसेच आंध्र प्रदेश सरकार 'असनी'बाबत हाय अलर्टवर आहेत. चक्रीवादळामुळे समुद्र खवळलेला आहे. चक्रीवादळ मंगळवारी रात्री उशिरा वायव्येकडे सरकेल. नंतर पुढे ते इशान्येकडे सरकण्याची शक्यता आहे, असे हवामान खात्याकडून मंगळवारी दुपारी सांगण्यात आले होते.

चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता इंडिगोने विशाखापट्टणम विमानतळावर येणारी आणि या विमानतळावरून जाणारी तब्बल 23 उड्डाणे रद्द केली आहेत. चेन्नई विमानतळावरून अशी 11 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. आंध्र प्रदेशातील अनेक भागांत 11 मेपर्यंत पावसाची शक्यता आहे. वार्‍यांचा वेगही ताशी 40 ते 60 किलोमीटर असू शकेल.

बंगालमध्येही वादळाचा कहर सुरू आहे. कोलकात्यात मुसळधार पाऊस झाला. जनजीवन विस्कळीत झाले आहे. महानगरातील अनेक भागांत पाणी साचले आहे.

ओडिशात उंच लाटांमध्ये समुद्रात अडकलेल्या सहा बोटी एकामागून एक उलटल्या. मोठा गोंधळ उडाला. मात्र, वेळीच सर्व मच्छीमारांना सुरक्षितपणे किनार्‍यावर आणले गेले. विशेष म्हणजे, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा तसेच जे समुद्रात आहेत, त्यांना तातडीने परतण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT