पूर्णा, पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील दस्तापूर शिवारातील दोन ठिकाणी अडवण्यात आलेले शेतरस्ते तात्काळ खुले करुन देण्याच्या मागणीसाठी पूर्णा तहसिल कार्यालया समोर प्रहार जनशक्ती पक्ष व संबंधित शेतकऱ्यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. ( Parbhani Farmers Protest )
याबाबत अधिक माहिती असी की, पूर्णा तालूक्यातील दस्तापूर येथील काही शेतकऱ्यांची गट क्रमांक ५६,५७,५८,६०,६२ मध्ये जमीन आहे. तेथे जाण्यासाठी गट क्रमांक ५२, ६१ मधून वडिलोपार्जित शेत रस्ता होता, तशी महसूल दप्तरी नोंद आहे. परंतू, खोडसाळपणे पुरभाजी बापूराव गोरे, निवृत्ती गोरे, निवृत्ती गोरे यांनी रस्ता आडवला आहे. त्यामुळे शेती कामे करण्यासाठी जाता येत नाही.
त्याच बरोबर येथीलच दस्तापूर शिवार गट क्रमांक ४०, ४१, ४२, ४३, ४४ मध्ये काही शेतकऱ्यांची जमीन असून सदर गटातील शेतात जाण्यासाठी गट क्रमांक ४५ मधून रस्ता आहे . शासकीय नोंद असलेला वडिलोपार्जित व सध्या अस्तित्वात असणारा रस्ता तेथील सय्यद गफार, सय्यद शब्बीर यांनी अडवला आहे.
दरम्यान, रस्ते तत्काळ खुले करुन देण्यासाठी संबंधित शेतकरी मधूकर गाडेकर, उत्तम गाडेकर, माधव गाडेकर, गुणाजी गायकवाड, विष्णू शिनगारे, श्रीहरी गायकवाड, गणेश गाडेकर, ज्ञानेश्वर गाडेकर,सिकंदर पठाण, कैसरखा पठाण, रशिद खा पठाण, सुरेश गोरे,रामा कसबे,आबा गायकवाड यासह प्रहारचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, तालुका प्रमुख शिवहार सोनटक्के, विष्णू बोकारे, विठ्ठल जोगदंड हे आमरण उपोषणाला बसले आहेत. जो पर्यंत रस्ता खुला करुन दिला जात नाही. तोपर्यंत हे उपोषण चालूच राहणार असल्याचे शिवहार सोनटक्के यांनी सांगितले.