पुढारी ऑनलाईन डेस्क : ज्ञानवापी मशिदीबद्दल (Gyanvapi Case) विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
(Yogi Adityanath ) यांनी मोठे विधान केले आहे. मशिदीच्या आत त्रिशूल काय करत होते, असा सवाल त्यांनी 'एएनआय'च्या पॉडकास्टमध्ये केला आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे की, "ज्ञानवापी मशिदीच्या आत त्रिशूल काय करत होते?. त्याला मशीद म्हटले तर वाद होईल. मला वाटते की, हा प्रस्ताव मुस्लिम समुदायाकडून आला पाहिजे की, ही एक ऐतिहासिक चूक झाली आहे. आम्हाला त्या चुकीवर उपाय हवा आहे."
'एएनआय'च्या पॉडकास्टमध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, "देश मत आणि धर्माने नव्हे तर भारतीय राज्यघटनेवर चालवला जाईल. तुमचे मत, तुमचा धर्म तुमच्या पद्धतीने असेल, तुमच्या घरात असेल. तो रस्त्यावर परफॉर्म करण्यासाठी नाही. तुम्ही कोण आहात हे तुम्ही इतरांवर लादू शकत नाही. राष्ट्र प्रथम आहे. कुणाला देशात राहायचे असेल, तर स्वत:चे मत, धर्म नव्हे, तर राष्ट्र सर्वप्रथम मानले पाहिजे."