अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण यांच्यातील युद्धामुळे देशभरात ज्या घरगुती गॅस सिलिंडरसाठी नागरिकांची धावपळ सुरू आहे, त्यामध्ये 14.2 किलो एलपीजी असतो.
तो कधीही पूर्णांकात म्हणजे 14 किंवा 15 किलो भरला जात नाही, यामागे एक महत्त्वाचे कारण आहे.
1950 च्या दशकात देशात बर्मा शेल नावाची विदेशी कंपनी गॅसचा पुरवठा करायची. या कंपनीने सर्वात आधी सिलिंडरचा सध्याचा खास आकार आणि वजन ठरवले.
यानंतर हीच कंपनी कालांतराने भारत पेट्रोलियम बनली. याच बर्मा शेल कंपनीने त्या काळात 14.2 किलोचा आकडा नक्की केला. तेव्हा सिलिंडरचे लोखंडासह एकूण वजन सुमारे 30 किलोपर्यंत होते.
एका सर्व्हेनुसार, एक सामान्य भारतीय व्यक्ती एवढे वजन सहजपणे उचलू शकत होती; मात्र वजन 30 किलोपेक्षा जास्त असते, तर सिलिंडर हलवणे थोडे कठीण झाले असते.
तसेच त्यावेळी दरमहा एका मध्यमवर्गीय कुटुंबाला 14 किलोच्या आसपास गॅस लागतो. हा गॅस 30-45 दिवस सहज पुरत असे. इतक्या दिवसाच्या अवधीत कंपनीसाठीही दुसरे सिलिंडर पुरवणे शक्य होते.
तसेच, ठरवलेल्या लोखंडी टाकीत जर 14.2 किलोपेक्षा जास्त गॅस भरण्याचा प्रयत्न केला गेला, तर सिलिंडरचा स्फोट होण्याचा धोका निर्माण झाला असता. यासाठी टाकी खूपच जाड बनवावी लागली असती. ते खर्चिक होते.
त्यामुळे त्या काळातील इंजिनिअर्सने सिलिंडरच्या आतील रिकामी जागा, गॅस पसरण्याची क्षमता आणि दबाव सहन करण्याची ताकद लक्षात घेऊन सर्वात अचूक आणि सुरक्षित असे गॅसचे वजन 14.2 किलो इतके निश्चित केले.