Latest

मुंबईतील पाणी 6 ते 7 टक्केने महागणार !

Arun Patil

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारच्या भातसा व अप्पर वैतरणा तलावातून उचलण्यात येणाऱ्या पाण्यासाठी मोजावे लागणारे शुल्क, कर्मचाऱ्यांच्या आस्थापना खर्चात होत असलेली वाढ, वीज बिलात झालेली वाढ या सर्वांचा विचार करून मुंबईतील पाणीपट्टीत 6 ते 7 टक्क्यापर्यंत वाढ करण्यात येणार असल्याचे समजते. याची अंमलबजावणी 16 जून पासून करण्यात येणार असून याबाबतचा प्रस्ताव पालिका आयुक्तांच्या अंतिम मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे.

जल अभियंता खात्याचा आस्थापना खर्च (कर्मचार्‍यांचा पगार व अन्य भत्ते), प्रशासकीय खर्च, प्रचालन व परिरक्षण खर्च, विद्युत खर्च व शासनाच्या भातसा व अप्पर वैतरणा धरणातून उपसा केलेल्या पाण्याची पाणीपट्टी यांच्या एकत्रिक खर्चाचा आढावा घेऊन, दरवर्षी पाणीपट्टी वाढ करायची की नाही, याचा निर्णय घेतला जातो. प्रतिवर्षी 8 टक्केपर्यंत वाढ करण्याचा अधिकार स्थायी समितीने पालिका प्रशासनाला दिला आहे. त्यानुसार यावेळी 6 ते 7 टक्के पाणीपट्टी वाढ करण्यात येणार आहे. पुढील आठवड्यात याबाबत निर्णय घेऊन तसा प्रस्ताव पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे.

पालिकेच्या लेखापाल विभागाकडून पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यात किमान प्रति एक हजार लिटर मागे 25 पैसे ते 4 रुपये पर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय नियमानुसार 70 टक्के मलनि:सारण शुल्क स्वतंत्र द्यावा लागणार आहे. मात्र मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक लक्षात घेऊन, पाणीपट्टी वाढ करण्यात येऊ नये यासाठी राज्य सरकार हस्तक्षेप करू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT