इचलकरंजी ः पुढारी वृत्तसेवा : इचलकरंजी शहरातील एकमेव जीवनदायिनी असलेल्या कृष्णा पाणी योजनेची मंगळवार दुपारी चार वाजता पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांनी अचानकपणे भेट देऊन पाणी उपसा बंद केला पालिकेने पाटबंधारे विभागाच्या पाणीपट्टीचे 9 कोटी रुपये बील थकविल्याने ही कारवाई केली. त्यामुळे सायंकाळनंतर शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला.
इचलकरंजी शहराला पंचगंगा व कृष्णा या दोन योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. परंतु पंचगंगा योजना बेभरवशाची असल्याने एका कृष्णा योजनेवरच शहराला जेमतेम पाणीपुरवठा सुरू आहे.
वादळी वार्याने तारा तुटल्याने दोन दिवस योजना बंद होती. सोमवारी पाणी पुरवठा सुरू करण्यात आला. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला होता.
परंतु मंगळवारी अनपेक्षितपणे पुन्हा वीज तोडल्याने पाणी पुरवठा खंडित झाला आहे. दरम्यान, थकबाकीपैकी 31 मार्चपर्यंत 1 कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले. त्यापैकी 30 लाखाचा धनादेश देण्यात आला होता. तर उर्वरित 70 लाख रुपये 31 मार्चपर्यंत देण्याचे ठरले होते. परंतु एकरकमी 1 कोटी रुपये पाहिजेत, अशी मागणी करीत पाटबंधारेच्या अधिकार्यांनी पाणी उपसा बंद केला.