वॉशिंग्टन :
जगभरात जल-वायू परिवर्तनाचे गंभीर परिणाम आता सर्वत्र दिसत आहेत. यामुळे दिवसेंदिवस जीवन जगणे अवघड बनू लागले आहे. या समस्येवर नियंत्रण मिळविण्याचे दावे फोल ठरू लागले आहेत. मात्र, यासंदर्भात होत असलेल्या संशोधनातील निष्कर्ष चिंता वाढविणारे ठरत आहेत. नव्या संशोधनातील निष्कर्षानुसार जल-वायू परिवर्तनचा परिणाम जलतंत्रावर होत आहे. यामुळे पाण्यातील पोषणाचा स्तर कमी होत आहे. याशिवाय प्रत्येक वस्तूंमध्ये विषारी घटक वाढत आहेत.
'सायंटिफिक रिपोर्टस्' नामक जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार हे संशोधन पाण्याचे तापमान व त्यात कार्बनिक तत्त्व मिसळण्याचे प्रमाण वाढल्याने पाण्याचा रंग कसा बदलतो, यासंदर्भात करण्यात आले. डार्क माऊथ कॉलेजचे संशोधक व संशोधनाचे मुख्य लेखक पियानपियन वू यांनी सांगितले की, जल-वायू परिवर्तनामुळे पाण्याचे तापमान वाढल्याने जमिनीतून कार्बनिक तत्त्वांचे पाण्यात मिसळण्याच्या प्रमाणावर परिणाम होत आहे.
पियानपियन वू यांनी पुढे सांगितले की, पाण्याचा रंग कसा बदलत आहे, हे जाणून घेण्यासाठी हे संशोधन करण्यात आले. यासाठी मेसोकोस्म सिस्टमचा वापर करण्यात आला. ही एक प्रायोगिक प्रणाली आहे. यामध्ये नियंत्रित परिस्थितीमध्ये प्राकृतिक वातावरणाचा अभ्यास करण्यात येतो. संशोधनादरम्यान पाण्याचे तापमान व रंगातील बदलामुळे पॉलिअनसॅच्यूरेटेड अॅसिडचे प्रमाण कमी होत असल्याचे आढळले. फाईटोप्लँकटान या जलीय पारिस्थितिकी तंत्रात पॉलिअनसॅच्यूरेटेड फॅटी अॅसिड हे मुख्य स्रोत आहे. फाईटोप्लँकटानचे प्रमाण कमी झाल्याने मासे, वन्यजीव आणि मनुष्यासाठी मिथाईल मर्करीचे प्रमाण वाढण्याचे संकट वाढते.