त्रिवेंद्रम : प्राचीन भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली अनमोल देणगी म्हणजे योगविद्या. त्यामध्येच ध्यानाचा समावेश होतो. ध्यानाने केवळ आध्यात्मिकच नव्हे तन-मनाच्या आरोग्यासाठीचेही अनेक लाभ होत असतात. ध्यानाने मन संयत बनते व आंतरिक शांती मिळते. मेंदूतील तणाव कमी करण्याची क्षमता ध्यानामध्ये असते याची पुष्टी संशोधनातून झाली आहे.
त्रिवेंद्रम येथील श्री चित्रा तिरुनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेज अँड टेक्नॉलॉजीमधील वैज्ञानिकांना आढळले की ध्यानामुळे मेंदूच्या अनेक विकारांवरील उपचार प्रभावी बनू शकतात. तसेच स्मरणशक्तीशी संबंधित अनेक आजारांवर ध्यानामुळे काही अंशी नियंत्रण मिळवता येऊ शकते. अल्झायमरच्या प्रारंभिक स्थितीमध्ये रुग्णांना ध्यानाने लाभ मिळू शकतो.
ध्यानामुळे मन आणि शरीर दोन्ही शांत करता येऊ शकते. माईल्ड कॉग्निटिव्ह इम्पेयरमेंट (एमसीआय) आणि अल्झायमरचे प्रारंभिक रूप ही एक अशी स्थिती असते ज्यामध्ये स्मरणशक्ती कमजोर होते; पण व्यक्ती कार्यात्मक रूपाने स्वतंत्र राहतो. अशा रुग्णांना दिलासा देणार्या अनेक उपचार पद्धतींमध्ये ध्यानही एक संतुलित आणि प्रभावी पद्धत ठरू शकते. याबाबत संशोधकांनी दोन टप्प्यांमध्ये संशोधन केले. त्यांना असे दिसून आले की ध्यानाचा सातत्याने सराव केल्याने आंतरिक आणि बाह्य जागरूकतेबरोबर चांगला समन्वय साधता येऊ शकतो. ध्यानाचा लाभ हृदय, रक्तप्रवाह आणि चयापचय क्रियेलाही होतो.