रायगड (छत्तीसगड) : आजच्या आधुनिक काळातही काही परंपरा आपल्याला थक्क करून सोडतात. छत्तीसगडच्या रायगड जिल्ह्यातील भूपदेवपूरमधील बिलासपूर गावात अशीच एक १०० वर्षे जुनी परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने जपली जात आहे. येथे राठिया कुटुंबात नवीन सुनेला घरात प्रवेश करण्यापूर्वी चक्क जळत्या निखाऱ्यांवरून चालावे लागते.
बिलासपूर गावातील राठिया समाजात ही परंपरा एका ’अग्निपरीक्षे’सारखी मानली जाते. लग्नानंतर वरात जेव्हा गावात परतते, तेव्हा संपूर्ण गावासमोर हा सोहळा पार पडतो. मान्यता अशी आहे की, जे जोडपे या निखाऱ्यांवरून चालून घरात प्रवेश करते, त्यांना आयुष्यातील मोठ्यात मोठ्या संकटांना एकत्र सामोरे जाण्याची शक्ती प्राप्त होते. या परंपरेची सुरुवात वरात येण्यापूर्वीच होते. कुटुंबातील सदस्य मेहत्तर राठिया यांनी सांगितले की, सुनेच्या स्वागतासाठी संपूर्ण कुटुंब कडक उपवास करते.
रविवारच्या रात्रीपासून ते सोमवार सकाळपर्यंत, जोपर्यंत सून गृहप्रवेश करत नाही, तोपर्यंत कुटुंबातील एकही सदस्य पाण्याचा थेंबही पीत नाही. हे त्याग नवीन सुनेचा सन्मान आणि कुलदैवताप्रती असलेली श्रद्धा दर्शवते. गावात वरात आल्यावर नवदाम्पत्याला नवीन वस्त्रे आणि दागिने दिले जातात. यानंतर मुख्य विधीला सुरुवात होते. मांडवाजवळ (मडवा) विधीवत बकऱ्याचा बळी दिला जातो आणि त्यानंतर मांडव चारही बाजूंनी कापडाने झाकला जातो. विधीदरम्यान वराच्या वडिलांच्या अंगात कथितपणे दैवी शक्तीचा संचार होतो. त्यानंतर ते चुलीतील धगधगते लाल निखारे मांडवाच्या मध्यभागी पसरतात आणि स्वतः त्या निखाऱ्यांवर नाचू लागतात. वडिलांनंतर नवरदेव आणि नवरी एकमेकांचा हात धरून त्याच जळत्या निखाऱ्यांवरून लग्नाचे सात फेरे घेतात.