कोलकाता : भारतात एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंत रेल्वेचे जाळे पसरलेले आहे. त्यामुळे तुम्ही देशात कुठेही ट्रेनने प्रवास करू शकता. यासाठी हजारो ट्रेन आणि हजारो रेल्वे स्टेशन्स आहेत. यातील काही रेल्वेस्थानकांची नावेही विचित्र असतात. पण, भारतात असे एक रेल्वे स्टेशन आहे, ज्याला नावच नाही. आता हे रेल्वे स्टेशन कुठे आहे, असा प्रश्न नक्कीच पडला असणार! शिवाय या स्टेशनला नाव का नाही, याचे कारणही तितकेच रंजक आहे.
पश्चिम बंगालमध्ये असलेले हे रेल्वे स्टेशन 2008 पासून कोणत्याही नावाशिवाय कार्यरत आहे. येथे रोज गाड्या थांबतात, प्रवासी उतरतात आणि चढतात; पण स्टेशनला नाव नाही. हे अनोखे रेल्वे स्टेशन पश्चिम बंगालच्या बर्दवान शहरापासून 35 किलोमीटर अंतरावर आहे. त्याचे नाव न देण्यामागचे कारण म्हणजे रैना आणि रायनगर गावांमधील प्रादेशिक वाद. भारतीय रेल्वेने 2008 मध्ये जेव्हा हे स्टेशन बांधले, तेव्हा त्याचे नाव ‘रायनगर’ असे ठेवण्यात आले होते. परंतु, स्थानिक लोकांनी या नावावर आक्षेप घेत ते बदलण्याची मागणी रेल्वे बोर्डाकडे केली होती. हे प्रकरण कोर्टात गेले आणि तेव्हापासून हे स्टेशन नावाशिवाय सुरू आहे. स्थानकाच्या दोन्ही बाजूला रिकामे पिवळे फलक आहे. आताही तेथे रेल्वे येते, थांबते, प्रवाशांची चढ-उतार होते. मात्र, आता या रेल्वे स्थानकावर उतरायचे असेल तर त्याची तिकिटे कशी काढली जातात, या स्थानकासाठी आरक्षण कसे केले जाते, या प्रश्नांची उत्तरे मात्र गुलदस्त्यातच आहेत.