विश्वसंचार

‘हे’ पदार्थही उकाड्यात शरीर ठेवतात थंड

Arun Patil

नवी दिल्ली : आपण उन्हाळ्यात संपूर्ण शरीराला थंडावा देणारे अन्नपदार्थ शोधतो. आता पावसाळा सुरू झालेला असला, तरी उकाडा कमी झालेला नाही. अशा वेळी नारळ पाणी, लिंबू पाणी यासारख्या गोष्टींचे सेवन करणे फायदेशीर ठरते. यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि शरीराला थंडावाही मिळतो. मात्र, अन्यही काही पदार्थ आहेत, ज्यांचे सेवन अशा वेळी लाभदायक ठरते. या पदार्थांची प्रकृती थंड असते. यामुळे तुमचे शरीर दीर्घकाळ थंड राहते. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी देखील हे प्रभावी ठरू शकते, असे तज्ज्ञ सांगतात.

सब्जा बियाणे : सब्जाच्या बियांमध्ये थंडावा असतो, त्यामुळे शरीर आणि मन दोन्ही थंड ठेवण्यासाठी ते प्रभावी आहे. सब्जाच्या बियांचे नियमित सेवन केल्याने तुम्ही तुमची पचनशक्ती देखील वाढवू शकता. अपचन आणि बद्धकोष्ठतेच्या समस्यांपासूनही आराम मिळतो.

गुलकंद : गुलकंदची प्रकृती थंड आहे आणि ते अनेक प्रकारच्या अँटिऑक्सिडंटस्नी समृद्ध आहे. यामध्ये प्रोबायोटिक्स आढळतात, जे पचनासाठी खूप चांगले मानले जाते. एवढेच नाही, तर शरीरातील घाण काढून टाकण्यासाठी तुम्ही गुलकंदचे सेवन करू शकता.

पुदिना : पुदिन्याच्या पानांचा थंड प्रभाव असतो. हे शरीराचे तापमान नियंत्रित करते. शरीर थंड ठेवण्यासाठी तुम्ही पुदिन्याच्या पानांचे सेवन करू शकता. यामुळे उन्हाळ्यात डोकेदुखीचा त्रास कमी होऊ शकतो. याशिवाय मायग्रेनपासूनही आराम मिळू शकतो.

सातू : सातू किंवा सत्तूच्या पाण्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूपच कमी असतो. यामुळे शरीरातील इन्सुलिन नियंत्रित राहण्यास मदत होते. उन्हाळ्यात सत्तूचे पाणी पिणे खूप फायदेशीर ठरू शकते. जर तुम्हाला साखरेची पातळी नियंत्रित ठेवायची असेल तसेच उन्हाळ्यात तुमचे शरीर थंड ठेवायचे असेल, तर तुम्ही सत्तूच्या पाण्याचे सेवन करू शकता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT