बंगळूर : आपल्या देशात अनेक अनोखी मंदिरे आहेत. प्रत्येक मंदिराचे एक वेगळे वैशिष्ट्यही असते जे सध्याच्या 21 व्या शतकातही कायम आहे. कर्नाटकातही अशी अनेक मंदिरे आहेत. रायचूर जिल्ह्यामध्ये 900 वर्षांपूर्वीचे श्री लक्ष्मी-व्यंकटेश मंदिरही असेच वेगळे वैशिष्ट्य असलेले आहे. या मंदिरातील श्री व्यंकटेशाच्या पाषाण मूर्तीवर रोज सकाळी गरम पाण्याने अभिषेक घातला जातो. असे म्हटले जाते की, हे उकळलेले पाणी ज्यावेळी मूर्तीच्या डोक्यावरील मुकुटावर ओतले जाते त्यावेळी ते पायापर्यंत येता येताच थंड होते.
सर्वसाधारणपणे एक लिटर पाणी 100 अंश सेल्सिअस तापमानापर्यंत गरम केले तर ते थंड होण्यासाठी दोन तासांचा कालावधी लागत असतो. मात्र, या मूर्तीच्या डोक्यावर ओतलेले असे उष्ण पाणी पायापर्यंत येता-येताच थंड होते. याउलट जर डोक्यावर थंड पाणी ओतले तर ते पायापर्यंत येत असताना उष्ण होते, असे सांगितले जाते. मात्र, जर मूर्तीच्या बेंबी किंवा पायावर उष्ण किंवा थंड पाणी ओतले तर ते आहे त्याच स्वरुपात वाहून जाते. या मूर्तीच्या काळ्या पाषाणात किंवा मूर्तीमध्ये असे कोणते वैशिष्ट्य आहे, ज्यामुळे डोक्यावर ओतलेले उष्ण पाणी तत्काळ थंड होते, याबाबत भाविकांना नेहमीच कुतुहल वाटत असते. कर्नाटकातच गदगमध्ये व्यंकटपुरा नावाचे गाव आहे. याठिकाणीही श्री लक्ष्मी-व्यंकटेश मंदिर आहे. या मंदिरातील मूर्तीचेही एक वेगळे वैशिष्ट्य आहे. याठिकाणी केवळ एक पाषाणच होता. त्यावर व्यंकटेशाची आकृती असलेल्या पुसटशा रेषा कोरलेल्या होत्या. शंभर वर्षांपूर्वीपासून हळूहळू या आकृतीमधून आपोआपच व्यंकटेशाची आकृती उत्थान पावत आकार घेऊ लागली. सध्या तिथे या पाषाणातून निर्माण झालेली सुंदर मूर्ती पाहायला मिळते, असे सांगितले जाते.