थिरुवनंतपुरम : केरळ वन संशोधन संस्थेने (केएफआरआय) एक असा क्रांतिकारी शोध लावला आहे, ज्यामुळे सागवान लागवडीचे सर्वात मोठ्या शत्रूपासून संरक्षण करणे शक्य होणार आहे. ‘साग पोखरणार्या अळ्या’ (हायब्लेईया प्युईरा) या विनाशकारी किडीमुळे होणारे प्रचंड नुकसान टाळण्यासाठी, या संस्थेने एका नैसर्गिक विषाणूचा (एचपीएनपीव्ही) यशस्वीरीत्या शोध लावून त्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन केले आहे आणि पेटंटही मिळवले आहे. हे तंत्रज्ञान रासायनिक कीटकनाशकांना एक अत्यंत प्रभावी आणि पर्यावरणपूरक पर्याय ठरणार आहे.
दशकांपासून, ‘साग पोखरणार्या अळ्या’ सागवान लागवडीसाठी एक मोठी डोकेदुखी ठरल्या आहेत. या अळ्या वर्षातून सहा वेळा संपूर्ण जंगलातील झाडांची पाने खाऊन फस्त करतात. यामुळे झाडे कमकुवत होतात आणि त्यांच्या वाढीवर गंभीर परिणाम होतो. केएफआरआयचे प्रमुख शास्त्रज्ञ टी.व्ही. सजीव सांगतात, जेव्हा या अळ्या झाडांवर हल्ला करतात, तेव्हा झाडाची सर्व ऊर्जा वाढीऐवजी नवीन पाने उगवण्यातच खर्च होते. हे एक मोठे ‘अद़ृश्य नुकसान’ आहे. यापूर्वी केरळमधील कोन्नी आणि मध्य प्रदेशातील बरनवपारा येथे रासायनिक कीटकनाशकांची हवाई फवारणी करून या किडीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न झाला होता; परंतु पर्यावरणाच्या चिंतेमुळे त्याला तीव्र विरोध झाला.
केएफआरआयच्या संशोधनानुसार, या किडीमुळे होणारे आर्थिक नुकसान प्रचंड आहे. अंदाजे दरवर्षी प्रति हेक्टर 3 घनमीटर लाकडाचे नुकसान होते, ज्याची किंमत कोट्यवधी रुपये इतकी आहे. या समस्येवर मात करण्यासाठी, केएफआरआय ने या किडीच्या नैसर्गिक शत्रूंचा अभ्यास केला आणि हायब्लिया प्युएरा न्यूक्लिओपॉलीहेड्रोसिस व्हायरस (एचपीएनपीव्ही) या विषाणूवर लक्ष केंद्रित केले. या विषाणूची सर्वात मोठी खासियत म्हणजे तो फक्त साग पोखरणार्या अळ्यांनाच लक्ष्य करतो. त्यामुळे जंगलातील इतर उपयुक्त कीटक, प्राणी किंवा पर्यावरणाला कोणताही धोका पोहोचत नाही.
डॉ. संजीव सांगतात, या विषाणूचे सौंदर्य त्याच्या कार्यपद्धतीत आहे. तो एका अळीच्या शरीरात तब्बल एक ट्रिलियन पटीने वाढतो. जेव्हा त्या अळीचा मृत्यू होतो, तेव्हा तिच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात विषाणू बाहेर पडून इतर अळ्यांना संक्रमित करतात. जरी संसर्ग सुरुवातीला प्राणघातक नसला, तरी तो विषाणू किडीच्या शरीरात राहतो आणि पुढच्या पिढीमध्ये जाऊन त्यांना नष्ट करतो.