नवी दिल्ली : भूक ही नैसर्गिक असते. एखादी व्यक्ती तिच्या नेहमीच्या वेळेत जेवली नाही किंवा उशीर केला तर भूक लागते. सर्वसाधारणपणे एक व्यक्ती दिवसभरात दोन वेळा जेवते आणि जेवणाच्या आधीच्या वेळेत स्नॅक्स म्हणून काहीतरी खाते. मात्र, अनेकदा एखाद्याला अवेळी किंवा वारंवार भूक लागत असल्याचे दिसून येते. असे केव्हातरी होणे ठीक; परंतु नियमित किंवा वारंवार होत असेल तर त्यामागे गंभीर कारणे असू शकतात. आहारतज्ज्ञांनी याबाबत लोकांना अलर्ट केलेय. त्यांनी याबाबत काही टिप्स आणि ट्रिक्स शेअर केल्या आहेत. या टिप्स आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.
आहारतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, जर तुम्ही कमी जेवत असाल तर तुम्हाला वारंवार भूक लागू शकते. जेवताना कमी खाल्ल्याने आपल्या शरीरातील लेप्टिन आणि सिरोटोनिन पातळी बिघडते. जर तुम्ही नाष्टा, दुपारचे जेवण किंवा रात्रीच्या जेवणात पुरेसे अन्न खाल्ले नाही, तर तुम्हाला वारंवार भूक लागू शकते. शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाल्यानंतर भुकेची इच्छा जागते कारण अनेकदा तुम्हाला भूक नाही, तर तहान लागलेली असते. मात्र, आपला मेंदू गोंधळतो आणि तहानेला भूक समजतो. अशा वेळी पुरेशा प्रमाणात पाणी पिणे आवश्यक आहे. अपुर्या झोपेमुळेही भूक वाढू शकते. अपुर्या झोपेमुळे अनेक हार्मोन्स उदाहरणार्थ ग्रेलिन आणि लेप्टिन गोंधळतात आणि अवेळी भूक लागते. त्यामुळे चांगली झोप घेणे आवश्यक आहे.