जकार्ता : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानशी असलेले बर्याच गोष्टींसोबतचे संबंध तोडले आहेत. तसेच भारतातील मुस्लिमांना पुन्हा पाकिस्तानमध्ये जाण्यासाठी सांगण्यात आले आहेत. पहलगाम हल्ल्यावेळी धर्म विचारून पर्यटकांना ठार मारण्यात आले. या पार्श्वभूमीवर जगात एक असा देश आहे, जिथे 90 टक्के मुस्लिम राहतात आणि तेथील प्रत्येक घरात रामायण वाचले जाते. तेथे प्रत्येक घरात रामायणाचा ग्रंथ हा असतोच असतो. हा देश आहे इंडोनेशिया.
रामायण ही एकसांस्कृतिक आणि सामाजिक परंपरा असून, ती इंडोनेशियात मोठ्या प्रमाणावर स्वीकारली गेली आहे. अनेक मुस्लिम कुटुंबांमध्ये रामायणाचे वाचन नियमितपणे केले जाते. या देशाची लोकसंख्या 23 कोटींच्या आसपास आहे. हा जगातला सर्वात जास्त मुस्लिम लोकसंख्या असलेला देश आहे. इंडोनेशियात, काही मुस्लिम कुटुंबे रामायण वाचन आणि अभ्यास करतात. ते रामायणातील गोष्टी आणि त्यातून मिळणार्या मूल्यांना महत्त्व देतात. इंडोनेशियात हिंदू धर्मीय अल्पसंख्याक असले तरी बालीसारख्या काही ठिकाणी हिंदू धर्माचे पालन कसोशीने केले जाते. बालीमध्ये, रामायणाचे विविध रूपे आणि पद्धती आजही रूढ आहेत.
जेव्हा तेथील लोकांना विचारले गेले की, ‘तुम्ही रामायण का वाचता?’, तेव्हा तेथील लोकांनी सांगितले की, चांगली व्यक्ती होण्यासाठी रामायण वाचले जाते. हे कमी म्हणून की काय तेथील शाळेत-पाठ्य पुस्तकात रामचरित्र शिकवले जाते. धर्माला कट्टरतेशी न जोडता जे चांगले, योग्य वाटते ते स्वीकारणे ही इंडोनेशियाची खासियत म्हटली पाहिजे. यामुळेच तेथील लोकांच्याच म्हणण्यानुसार त्यांचा धर्म इस्लाम असला तरी संस्कृती रामायण आहे.
इंडोनेशिया आणि भारतातल्या रामायणात काहीसा फरक आहे. अयोध्या ही भारतातली रामनगरी आहे, तर इंडोनेशियात ते योग्या नावाने वसलेले आहे. तिथे रामकथा काकानिन किंवा काकावीन रामायण नावाने ओळखली जाते. भारतीय प्राचीन सांस्कृतिक रामायणाचे रचनाकार कवी वाल्मिकी ऋषी आहेत, तर इंडोनेशियात रामायणाचे रचनाकार कवी योगेश्वर आहेत.