बीजिंग : पर्यावरणासाठी गंभीर समस्या ठरणाऱ्या प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा एक अनोखा आणि प्रभावी मार्ग चीनने जगाला दाखवून दिला आहे. ईस्ट चायना युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये राबवण्यात आलेल्या एका रस्ते प्रकल्पात ६,००० हून अधिक दुधाच्या बाटल्या आणि इतर प्लास्टिक कचऱ्याचा वापर करून रस्ता तयार करण्यात आला. जागतिक वसुंधरा दिनानिमित्त सुरू करण्यात आलेला हा उपक्रम ‘डाऊ’ आणि प्रसिद्ध डेअरी ब्रँड ‘शायनी मीडो’ यांनी संयुक्तपणे राबवला होता.
या प्रकल्पामुळे शांघायमध्ये वापरलेल्या हजारो दुधाच्या बाटल्यांना कचराकुंडीत जाण्याऐवजी नवे आयुष्य मिळाले. सहसा अशा प्लास्टिकच्या बाटल्यांचे पारंपरिक पद्धतीने रीसायकलिंग म्हणजेच पुनर्प्रक्रिया करणे कमी फायदेशीर मानले जाते. ‘डाऊ’ कंपनीने स्पष्ट केले की, तांत्रिकदृष्ट्या या बाटल्या रीसायकलिंग करण्यास योग्य असल्या, तरी त्यांच्यात शिल्लक राहिलेल्या दुधामुळे दुर्गंधी आणि घाण पसरत असल्याने रीसायकलिंग करणारे ते स्वीकारण्यास कचरत असत. परिणामी, उपयुक्त प्लास्टिकही कचरा म्हणूनच फेकले जात होते. या समस्येवर मात करण्यासाठी ‘डाऊ’ने एका विशेष तंत्रज्ञानाचा वापर केला. या तंत्रज्ञानाद्वारे जमा केलेला प्लास्टिक कचरा ‘पोस्ट-कन्झ्युमर रीसायकल्ड’ प्लास्टिकमध्ये रूपांतरित करून ‘पॉलिमर-मॉडिफाइड डांबरा’मध्ये मिसळण्यात आला. त्यानंतर या मिश्रणाचा वापर रस्ता बांधणीसाठी करण्यात आला. कंपनीच्या मते, या उपक्रमाचा उद्देश केवळ प्लास्टिकची विल्हेवाट लावणे हाच नव्हता, तर डांबराचा वापर कमी करणे आणि रस्त्यांचे आयुष्य वाढवणे हादेखील होता. यामुळे हरितगृह वायूंचे उत्सर्जन आणि ऊर्जेचा वापर कमी होण्यास मदत
होते.