लंडन ः सध्या इराण युद्धामुळे जगभरातील अनेक देशांमध्ये पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे लोक आता इलेक्ट्रिक वाहनांकडे वळताना पाहायला मिळत आहेत. अशातच आता एका परदेशी कंपनीच्या दाव्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. FOWE इको सोल्यूशन्स या मोनॅकोस्थित कंपनीने अशी तंत्रज्ञान प्रणाली विकसित केल्याचा दावा केला आहे, ज्याच्या मदतीने वाहनं आणि औद्योगिक यंत्रणा कमी इंधनात चालू शकतात. कंपनीच्या मते, या तंत्रज्ञानामध्ये पाण्याचा वापर करून इंधनाची बचत 10 टक्क्यांपर्यंत करता येऊ शकते.
भारतासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण, देशाला लागणाऱ्या कच्च्या तेलापैकी सुमारे 88 टक्के तेल आयात करावे लागते. त्यामुळे इंधन बचतीशी संबंधित कोणतीही तंत्रज्ञान प्रणाली भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि रुपयाच्या मूल्यावर थेट परिणाम करू शकते. FOWE इको सोल्यूशन्स कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या पेटंट तंत्रज्ञानाला कॅविटेक फ्यूल इमल्शन असे नाव देण्यात आले आहे. या तंत्रज्ञानाद्वारे इंधन आणि पाणी विशेष पद्धतीने एकत्र मिसळले जाते. त्यामुळे इंधनामध्ये अतिशय सूक्ष्म पाण्याचे थेंब तयार होतात.
इंधन जळताना हे सूक्ष्म थेंब मायक्रो एक्सप्लोजन निर्माण करतात. त्यामुळे इंधन अधिक कार्यक्षमतेने जळते, ज्यामुळे इंधनाचा वापर कमी होतो आणि धूरही कमी प्रमाणात बाहेर पडतो. कंपनीचा दावा आहे की, हे तंत्रज्ञान वापरण्यासाठी इंजिनमध्ये कोणताही मोठा बदल करण्याची आवश्यकता नाही. FOWE इको सोल्यूशन्स कंपनी आणि इतर चाचण्यांनुसार, या तंत्रज्ञानामुळे बॉयलर आणि समुद्री इंजिनांमध्ये 6 ते 10 टक्क्यांपर्यंत इंधन बचत झाल्याचे समोर आले आहे. भारतातील काही रिफायनरी आणि स्टील प्लांटस्मध्येही या तंत्रज्ञानाची चाचणी करण्यात आली होती. त्यामध्ये 3.6 ते 6 टक्के इंधन बचतीची नोंद झाली आहे.
FOWE च्या मते या तंत्रज्ञानामुळे NOx आणि SOx सारख्या हानिकारक वायूंचे उत्सर्जन 40 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते. तसेच बॉयलर आणि भट्ट्यांमध्ये कमी प्रमाणात घाण साचते त्यामुळे मेंटेनन्स खर्चही कमी होऊ शकतो. सध्या हे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर सामान्य वाहनांमध्ये वापरले जात नाही. त्याची चाचणी औद्योगिक यंत्रणा, जहाजे आणि वीज प्रकल्पांमध्ये सुरू आहे. तज्ज्ञांच्या मते, जर हे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरले, तर भविष्यात इंधन बचतीच्या क्षेत्रात मोठा बदल घडू शकतो. याचा फायदा संपूर्ण जगाला होऊ शकतो.