नवी दिल्ली : पृथ्वीचा विनाश कधी होणार? हा प्रश्न अनादिकाळापासून मानवाला पडला आहे. आतापर्यंत नास्त्रेदमस किंवा बाबा वेंगा यांच्यासारख्या भविष्यवेत्त्यांच्या चर्चा होत असत. मात्र, आता विज्ञानाने यावर शिक्कामोर्तब केले आहे. ‘नासा’च्या सुपरकॉम्प्युटर मॉडेल आणि शास्त्रज्ञांच्या नव्या संशोधनानुसार, पृथ्वीवरील ऑक्सिजनचा साठा कायमस्वरूपी टिकणार नाही.
संशोधनात काही महत्त्वपूर्ण निष्कर्ष काढण्यात आले आहेत. सूर्याची वाढती उष्णता हा मोठा धोका पृथ्वीपुढे आहे. काझुमी ओझाकी आणि क्रिस्टोफर रेनहार्ड यांच्या संशोधनानुसार, पृथ्वीला सर्वात मोठा धोका हा सूर्यापासून आहे. जसजसा काळ पुढे जाईल, तसतशी सूर्याची चमक आणि उष्णता वाढत जाईल. सूर्याच्या तीव्र उष्णतेमुळे पृथ्वीचे तापमान वाढेल. त्यामुळे समुद्राचे पाणी बाष्पीभवन होऊन उडून जाईल. याचा थेट परिणाम ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या सूक्ष्म जीवांवर होईल. परिणामी, वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण झपाट्याने कमी होईल. यापूर्वी पृथ्वीवर आणखी 200 कोटी वर्षे जीवन टिकेल असे मानले जात होते; मात्र आता हा काळ केवळ 100 कोटी वर्षांवर आला आहे. म्हणजेच पृथ्वीची लाईफलाईन आता निम्मी झाली आहे.
पुन्हा एकदा प्राचीन काळ परतणार?
सुमारे 100 कोटी वर्षांनंतर पृथ्वीवरील ऑक्सिजनचे प्रमाण 1 टक्क्याहून कमी होईल. ही स्थिती पृथ्वीच्या सुरुवातीच्या काळातील ग्रेट ऑक्सीडेशन इव्हेंटपूर्वीच्या काळासारखी असेल. अशा वातावरणात मानव, प्राणी आणि झाडे जगू शकणार नाहीत; केवळ काही विशिष्ट प्रकारचे बॅक्टेरियाच तग धरू शकतील.
मानवाकडे बचावासाठी वेळ किती?
ही बातमी भीतीदायक वाटत असली, तरी संशोधकांनी सांगितले आहे की, ही घटना घडायला अजून 100 कोटी वर्षांचा कालावधी बाकी आहे. तोपर्यंत मानव तंत्रज्ञानाच्या जोरावर दुसऱ्या ग्रहावर वसाहत करू शकेल किंवा कृत्रिमरीत्या ऑक्सिजन निर्माण करण्याची पद्धत शोधून काढेल.