ब्राझिलिया : ब्राझीलच्या अॅमेझॉन जंगलात राबवण्यात आलेल्या एका दीर्घकालीन मोहिमेमुळे एका शहरातून मलेरियाचा आजार जवळपास संपुष्टात आला होता. मात्र, काही वर्षांतच या रोगाने पुन्हा डोके वर काढले. आता शास्त्रज्ञांनी यामागील खरे कारण शोधून काढले असून, त्याचा संबंध थेट जंगलाच्या बदलत्या स्वरूपाशी जोडला आहे.
जगातील सर्वात मोठ्या जलविद्युत प्रकल्पांपैकी एक असलेल्या शिंगू नदीवरील ‘बेलो माँटे धरणाच्या’ बांधकामादरम्यान उत्तर ब्राझीलमध्ये ही मोहीम राबवण्यात आली होती. २०१३ ते २०१७ या काळात राबवलेल्या या विशेष उपक्रमामुळे दरवर्षी आढळणाऱ्या मलेरियाच्या रुग्णांची संख्या १,२०० वरून थेट ६० पेक्षाही कमी झाली होती. मात्र, हा कार्यक्रम संपल्यानंतर काहीच वर्षांत संसर्गाने पुन्हा जोर धरला आणि वार्षिक रुग्णसंख्या ७०० च्या पार गेली. यावेळी मलेरियाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने ‘अल्तामिरा’ शहराच्या आसपासच्या ग्रामीण भागात दिसून आला.
गुरुवारी (९ जुलै) ‘जिओहेल्थ’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासात शास्त्रज्ञांनी अल्तामिरा परिसरातील गेल्या १५ वर्षांतील मलेरियाचे रेकॉर्ड आणि उपग्रहाद्वारे घेतलेल्या जंगलांच्या फोटोंचे विश्लेषण केले. या संशोधनातून एक वेगळीच माहिती समोर आली आहे. या भागात रस्ते बांधणी, पशुपालन, लाकूडतोड आणि मानवी वस्त्यांसाठी अॅमेझॉनचे जंगल मोठ्या प्रमाणावर तोडण्यात आले आहे. आधीच्या अभ्यासांनुसार, जंगलतोड आणि धरण बांधकामामुळे डासांच्या अळ्यांना पोषक वातावरण मिळते, ज्यामुळे मलेरिया वाढतो. परंतु, नव्या अभ्यासानुसार मलेरिया वाढण्याचे कारण केवळ ‘जंगल किती प्रमाणात तोडले’ हे नसून, ‘जंगलाची सीमा’ हे आहे.
जंगलाची सीमा म्हणजे असा भाग जिथे घनदाट जंगल संपते आणि मोकळी जमीन सुरू होते. या भागात डासांना जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी मिळतात: झाडांमुळे मिळणारी सावली, अळ्यांच्या वाढीसाठी उन्हाचा प्रकाश पडणारे साचलेले पाणी, शेजारीच राहणारे किंवा काम करणारे मनुष्यबळ (ज्यांच्यामुळे डासांना खाद्य मिळते). हा अभ्यास दाखवून देतो की, भौगोलिक आणि पर्यावरणीय परिस्थिती मलेरियाचा धोका वाढवण्यात किती मोठी भूमिका बजावते. शास्त्रज्ञांच्या मते, केवळ रुग्णांची संख्या कमी करणे पुरेसे नाही, तर अशा अतिधोकादायक भागात सातत्याने लक्ष ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे.