जयपूर : उन्हाळ्याच्या कडाक्यात घर थंड ठेवण्यासाठी आपण अनेकदा एसी किंवा कूलरचा आधार घेतो, ज्यामुळे विजेचे बिल गगनाला भिडते. मात्र, राजस्थानची राजधानी जयपूरमधील ४००० हून अधिक कुटुंबांनी या समस्येवर एक नैसर्गिक आणि स्वस्त उपाय शोधून काढला आहे. केवळ एका साध्या कल्पनेमुळे या घरांनी वाढत्या तापमानाचा ’गेम ओव्हर’ केला आहे.
उन्हाळ्यात घराचे छत सर्वाधिक तापते आणि त्यामुळे खालच्या खोल्यांमधील तापमान वेगाने वाढते. जयपूरच्या नागरिकांनी यावर उपाय म्हणून आपल्या रिकाम्या छतांचे रूपांतर छोट्या बागांमध्ये (टेरेस गार्डन) केले आहे. जिथे पूर्वी फक्त सिमेंटचे उष्ण छत होते, तिथे आता हिरवेगार रोपे, भाज्या आणि फुलांच्या कुंड्या नजरेस येतात. या पद्धतीमध्ये हलक्या वजनाचे खास बॉक्स किंवा बेड तयार केले जातात, ज्यात माती किंवा कोकोपीटच्या माध्यमातून रोपे लावली जातात.
याचे दोन मुख्य फायदे होतात :
१. थेट सूर्यप्रकाश रोखला जातो : सूर्याची उष्णता थेट छतावर न पडता रोपे ती शोषून घेतात.
२. नैसर्गिक थंडावा : झाडे हवेत ओलावा सोडतात, ज्यामुळे घराच्या आसपासची हवा नैसर्गिकरीत्या थंड होते. जयपूरमधील ४००० पेक्षा जास्त घरांनी या मॉडेलचा अवलंब केला आहे. येथील रहिवाशांच्या मते, एसी न वापरताही त्यांच्या खोल्या आता पूर्वीपेक्षा जास्त थंड राहतात. यामुळे त्यांच्या विजेच्या बिलात मोठी घट झाली असून, नैसर्गिक पद्धतीने त्यांना उष्णतेपासून दिलासा मिळत आहे.
या अभिनव कल्पनेमागे एका अशा व्यक्तीचा हात आहे, ज्याने आपली मोठी कॉर्पोरेट नोकरी सोडून हे काम सुरू केले. ‘छत ही केवळ रिकामी जागा नसून ती एक ’कूलिंग सिस्टीम’ बनू शकते,‘ हे त्यांनी लोकांना पटवून दिले. हळूहळू ही एक लोकचळवळ बनली आणि सोशल मीडियावरही या ’स्वस्त आणि मस्त’ मॉडेलचे जोरदार कौतुक होत आहे. तज्ज्ञांच्या मते, हा उपाय अत्यंत प्रभावी असला तरी प्रत्येक इमारतीसाठी तो योग्य ठरेलच असे नाही. ज्या इमारतींचे छत कमकुवत आहे किंवा जिथे जागा कमी आहे, तिथे काही मर्यादा येऊ शकतात. मात्र, जिथे शक्य आहे तिथे उन्हाळ्यापासून वाचण्यासाठी हा एक उत्तम आणि पर्यावरणपूरक मार्ग ठरत आहे.