तेहरान : सध्या पश्चिम आशियात सुरू असणारा संघर्ष जागतिक स्तरावर विविध रूपांमध्ये परिणाम करताना दिसता. एकीकडे तेल व्यापार आणि आयात-निर्यातीवर परिणाम होत असतानाच या युद्धाने आता भारताला आणखी एका मोठ्या संकटानजीक लोटल्याचे पाहायला मिळत आहे. कारण ठरतंय ते म्हणजे होर्मुझच्या सामुद्रधुनीवर घोंघावणारं संकट.
होर्मुझची सामुद्रधुनी हा भाग जगातील एक महत्त्वाचा आणि संवेदनशील असा विद्युत चेकपॉईंट समजला जातो. मुळात होर्मुझची सामुद्रधुनी ही केवळ तेल वाहतुकीसाठीच नव्हे तर डिजिटल पायाभूत सुविधांसमवेत डेटा वहनाच्या दृष्टीनंही अत्यंत महत्त्वाची आहे, ज्याचा हातभार जागतिक स्तरावरील पायाभूत सुविधांमध्ये होतो. सामुद्रधुनीच्या या भागात या सागरी मार्गाच्या तळाशी इंटरनेट डेटाचे वहन करणार्या फायबर ऑप्टिक केबल्सचे प्रचंड मोठे जाळे आहे. परिणामी पश्चिम आशियामध्ये होर्मुझ सामुद्रधुनीच्या परिसरात युद्ध चिघळल्यास भारतासह अनेक देशांतील इंटरनेट ठप्प होऊ शकतं, अशीच भीती व्यक्त करण्यात येत आहे.
जगातील बहुतांश इंटरनेट ट्रॅफिक हे उपग्रहांच्या माध्यमातून नव्हे, तर ते या फायबर ऑप्टिक केबलच्या माध्यमातून अर्थात समुद्राच्या तळाशी असणार्या केबलमधूनन जगभरात पसरतो. या सबरमरिन केबलमध्ये ई-मेल, आर्थिक देवाणघेवाणी, क्लाऊड डेटा, व्हिडीओ कॉल, मेसेज या आणि अशा अनेक डिजिटल कम्युनिकेशनची प्रक्रिया सुरळीतरीत्या पार पाडते. होर्मुझची ही सामुद्रधुनी आखाती देशांसह युरोपला आशिया खंडाशी जोडण्याचे महत्त्वाचे काम करते, जिथूनच या केबलसुद्धा या भौगोलिकदृष्ट्या दूर असणार्या भागांना एकमेकांशी जोडतात.
इंटरनेट केवळ उपग्रहांद्वारे चालते असा समज आहे. तो पूर्णांशाने खरा नसून जगातील बहुतांश इंटरनेटचे वहन समुद्राखालील फायबर ऑप्टिक केबल्सद्वारे होते. भारताची आंतरराष्ट्रीय इंटरनेट कनेक्टिव्हिटी प्रामुख्याने अरबी समुद्रातून आखाती प्रदेश आणि युरोपला जाणार्या केबल्सवर अवलंबून आहे. या केबल्सचा मोठा भाग होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जातो. भारतातून पश्चिमेकडे जाणार्या इंटरनेट ट्रॅफिकपैकी जवळपास एक तृतीयांश डेटा हा या क्षेत्रातून जाते. जो सामान्यांच्या अनेक महत्त्वाच्या गरजा पूर्ण करण्याची मदत करतो. सामुद्रधुनीतून पुढे जाणारा हा डेटा डिजिटल सर्विस, क्लाऊड कम्प्युटिंग प्लॅटफॉर्म, इंटरनॅशनल बँकिंग आणि फायनान्शिअल नेटवर्क, जागतिक व्यवसाय, सोशल मीडिया, ओटीटी अशा अनेक सुविधांवर यामुळे परिणाम पडू शकतो.