नवी दिल्ली : देशात आता कृषी क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (एआय) वापर वेगाने वाढत आहे. याच दिशेने आयआयटी रोपडने ‘ANNAM.AI’ नावाचा एक नवा आणि महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू केला आहे. संस्थेमध्ये स्थापन करण्यात आलेले हे ‘कृषी क्षेत्रासाठी एआय उत्कृष्टतेचे केंद्र’ (AI for Agriculture Centre of Excellence) आहे. कृषी क्षेत्रासाठी पूर्णपणे स्वदेशी आणि एआय आधारित तंत्रज्ञान विकसित करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शेतकरी, संशोधक आणि कृषी क्षेत्राशी संबंधित इतर घटकांना डेटा व डिजिटल तंत्रज्ञानाच्या आधारे योग्य निर्णय घेण्यास मोठी मदत होणार आहे.
ANNAM.AI हा कृषी क्षेत्रासाठी एक सामायिक 'एआय आणि डेटा प्लॅटफॉर्म' म्हणून विकसित केला जात आहे. शेतीशी संबंधित विविध संस्था, स्टार्टअप्स, उद्योग आणि सरकारी यंत्रणांना एकाच डिजिटल चौकटीत एकत्र आणणे, हा यामागचा हेतू आहे. यामुळे सर्व घटक मिळून शेतीसाठी नवनवीन तांत्रिक उपाय शोधू शकतील. हा उपक्रम कृषी क्षेत्राला अधिक आधुनिक, डेटा-आधारित आणि तंत्रज्ञान-संचालित बनवण्यासाठी कार्य करेल. ANNAM.AI कडे कृषी क्षेत्राचे 'डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर' म्हणून पाहिले जात आहे. ज्याप्रमाणे UPI ने डिजिटल व्यवहारांसाठी एक खुला आणि सामायिक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला, त्याचप्रमाणे ANNAM.AI कृषी क्षेत्रासाठी डेटा आणि 'एआय' चे जाळे तयार करत आहे.
यामुळे वेगवेगळ्या संस्था व स्टार्टअप्स एकाच प्लॅटफॉर्मचा वापर करून शेतकऱ्यांसाठी नवीन सेवा विकसित करू शकतील. या उपक्रमांतर्गत अत्याधुनिक वेदर स्टेशन विकसित केले जात आहेत. याद्वारे अत्यंत स्थानिक (Hyperlocal) पातळीवरील हवामानाचा अंदाज आणि सूक्ष्म-हवामान देखरेख (Micro-climate monitoring) शक्य होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना हवामानाची अचूक माहिती मिळेल आणि ऋतूनुसार पिकांचे नियोजन करणे सोपे जाईल. ANNAM.AI अंतर्गत ‘ACE' नावाचे एआय आधारित संवाद माध्यम (Chat Engine) तयार केले जात आहे. ही एआय प्रणाली शेतकऱ्यांपर्यंत वेळेवर अचूक कृषी माहिती, तज्ज्ञांचा सल्ला आणि आवश्यक मार्गदर्शन पोहोचवण्यास मदत करेल. विश्वसनीय माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हे याचे मुख्य ध्येय आहे.