नवी दिल्ली : उन्हाळ्याच्या दिवसांत अचानक आभाळ भरून येते आणि पावसासोबतच पांढर्या शुभ्र गारांचा वर्षाव सुरू होतो. उन्हाच्या चटक्यांमध्ये आकाशातून अचानक बर्फाचे हे गोळे पडताना पाहून अनेकांना आश्चर्य वाटते. पण, कडक उन्हात हे बर्फाचे गोळे नक्की तयार कसे होतात? यामागे एक रंजक वैज्ञानिक प्रक्रिया आहे.
गारा तयार होण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या ढगांची आणि वातावरणाची गरज असते. ही प्रक्रिया पुढील टप्प्यांत घडते. बाष्पीभवन आणि उर्ध्वगामी प्रवाह : कडक उन्हामुळे जमिनीवरील पाण्याची वाफ वेगाने वर जाते. जेव्हा हवेचा हा गरम प्रवाह अत्यंत वेगाने उंचावर जातो, तेव्हा तो आपल्यासोबत बाष्पाचे कणही घेऊन जातो. क्युम्युलोनिम्बस ढग : हे बाष्पाचे कण आकाशात खूप उंचीवर गेल्यावर त्यांचे रूपांतर मोठ्या ढगांमध्ये होते, ज्यांना शास्त्रज्ञ ‘क्युम्युलोनिम्बस’ (Cumulonimbus) ढग म्हणतात. या ढगांची उंची जमिनीपासून कित्येक किलोमीटरपर्यंत असू शकते. अतिथंड तापमान : आकाशात जसजसे उंच जावे, तसे तापमान कमी होत जाते.
ढगांच्या वरच्या भागात तापमान 0° C (गोठणबिंदू) पेक्षाही खूप खाली असते. जेव्हा पाण्याचे थेंब हवेच्या जोराच्या प्रवाहामुळे या अतिथंड भागात पोहोचतात, तेव्हा त्यांचे रूपांतर बर्फाच्या लहान कणांत होते. थरांवर थर साचणे : हे बर्फाचे कण ढगांमध्ये वर-खाली फिरत राहतात. या प्रवासात त्यांच्यावर पाण्याचे आणखी थर साचतात आणि ते पुन्हा गोठतात. ही प्रक्रिया जितका जास्त वेळ चालते, तितका गारांचा आकार मोठा होत जातो. गुरुत्वाकर्षण आणि वर्षाव : जेव्हा गारांचे वजन इतके वाढते की, हवेचा प्रवाह त्यांना पेलू शकत नाही, तेव्हा त्या गुरुत्वाकर्षणामुळे वेगाने जमिनीकडे झेपावतात. यालाच आपण ‘गारपीट’ म्हणतो.
ढगांमधील हवेचा प्रवाह किती शक्तिशाली आहे, यावर गारांचा आकार अवलंबून असतो. हवा जितक्या जास्त वेळ या बर्फाला ढगांच्या थंड भागात रोखून धरेल, तितक्या मोठ्या आकाराच्या गारा तयार होतात. काही वेळा या गारांचा आकार लिंबाएवढा किंवा अगदी टेनिस बॉलएवढाही मोठा असू शकतो. पावसासोबत येणार्या गारा दिसायला जरी सुंदर असल्या, तरी त्या शेतीसाठी अत्यंत घातक ठरतात. विशेषतः फळबागा आणि रब्बी पिकांचे यामुळे प्रचंड नुकसान होते. हवामान विभाग सध्या रडार आणि उपग्रहांच्या मदतीने अशा ढगांची निर्मिती ओळखू शकतो, ज्यामुळे गारपिटीचा अंदाज वर्तवणे शक्य झाले आहे.