नवी दिल्ली : ‘पालेभाज्या खा, नाहीतर आजारी पडाल,’ हे वाक्य आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत; पण आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश केल्याने शरीरात नेमके काय बदल होतात? ताज्या संशोधनानुसार, पालेभाज्यांचे नियमित सेवन केल्याने केवळ पोषण आणि ताकदच मिळत नाही, तर ‘मेटाबॉलिक सिंड्रोम’ यासारख्या धोकादायक समस्यांपासूनही संरक्षण मिळते.
मोहरी, मेथी आणि पालक यांसारख्या भाज्या प्रामुख्याने दोन प्रकारे फायदेशीर ठरतात :
1. पोषण : या भाज्या शरीराच्या सर्व अवयवांसाठी आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि प्रथिने पुरवतात.
2. संरक्षण : या भाज्या मेटाबॉलिक सिंड्रोमशी संबंधित समस्या रोखण्यास मदत करतात, ज्यामुळे सध्या जगभरातील करोडो लोक त्रस्त आहेत. हा ‘मेटाबॉलिक सिंड्रोम’ काय आहे? असा प्रश्न अनेकांना पडेल. चयापचय क्रियेत बिघाड झाल्यामुळे होणार्या विविध आजारांच्या समूहाला ‘मेटाबॉलिक सिंड्रोम’ म्हटले जाते. खराब जीवनशैली किंवा अनुवांशिक कारणांमुळे हे आजार उद्भवू शकतात. ‘NCBI’ वरील संशोधनानुसार, यामध्ये प्रामुख्याने पुढील समस्यांचा समावेश होतो : उच्च रक्तदाब, इन्सुलिन रेझिस्टन्स (मधुमेहाचा धोका), पोटाचा घेर वाढणे, यकृतावर चरबी साचणे आणि हृदयविकार.
पालेभाज्यांमध्ये कॅलरीज खूप कमी; पण फायबरचे प्रमाण भरपूर असते. यातून शरीराला व्हिटॅमिन सी, ए (कॅरोटीन), ई, बी-कॉम्प्लेक्स तसेच पॉलिफेनोल्स, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम आणि अँटिऑक्सिडंटस् भरपूर प्रमाणात मिळतात. ‘नेचर’ (Nature) पत्रिकेत प्रकाशित झालेल्या ‘Kaewpradup’ यांच्या वैज्ञानिक अहवालानुसार, ज्यांच्या आहारात शिफारस केलेल्या प्रमाणापेक्षा 1.5 पट जास्त पालेभाज्या होत्या, त्यांच्या चयापचय क्रियेत मोठी सुधारणा दिसून आली. पालेभाज्यांमधील अँटिऑक्सिडंटस् आणि नायट्रेटस्मुळे कर्बोदकांचे पचन संथ होते आणि लिपिड पचनही कमी होते. यामुळे रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल वाढण्याचा वेग मंदावतो. परिणामी, हृदयविकाराचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो.