जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेतील कडक उन्हाच्या दिवसांत, तिथे आढळणाऱ्या ‘दक्षिणी पाइड बॅबलर्स’ या मादी पक्ष्यांचा मेंदू नीट काम करेनासा होतो. एका पारदर्शक प्लास्टिकच्या पडद्यामागे ठेवलेले त्यांचे आवडते खाद्य (किडे) मिळवण्यासाठी हे मध्यम आकाराचे काळे-पांढरे पक्षी धडपडत असतात. थंड किंवा सामान्य हवामान असलेल्या दिवसांत, या पक्ष्यांना सहज समजते की केवळ त्या छोट्या प्लास्टिकच्या भिंतीला वळसा घालून गेल्यास खाद्य मिळू शकते. परंतु, जेव्हा तापमानाचा पारा वाढतो, तेव्हा मात्र हे पक्षी गोंधळात पडतात आणि खाद्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्या पारदर्शक पडद्यावरच सातत्याने चोची मारत राहतात. अशीच स्थिती अनेक प्राण्यांचीही आहे.
हा प्रयोग एका मोठ्या जागतिक संशोधनाचा भाग आहे, ज्यातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे, ‘उष्णतेच्या लाटेमुळे प्राण्यांची विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता मंदावते.’ संशोधनानुसार, जेव्हा बाहेर प्रचंड उष्णता असते, तेव्हा पक्ष्यांना नवीन गोष्टी शिकण्यात अडचणी येतात, कुत्रे अधिक प्रमाणात चावतात, तर शेळीसारखे दिसणारे ‘चामोईस’ हे प्राणी एकमेकांशी विनाकारण भांडू लागतात. उन्हामुळे प्राण्यांची केवळ चिडचिडच होते असे नाही, तर त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्नही निर्माण होतो.
या अभ्यासाच्या सह-लेखिका आणि ‘युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया’ येथील वर्तणूक पर्यावरणशास्त्रज्ञ अमांडा रिडले म्हणतात, “जर प्राणी उष्णतेमुळे पुरेसे सतर्क राहू शकले नाहीत, तर त्यांना अन्न शोधण्यात आणि भक्षकांपासून स्वतःचा बचाव करण्यात अपयश येईल. परिणामी, त्यांच्या जगण्याची शक्यता कमालीची घटते.” हवामान बदलामुळे आता उष्णतेच्या लाटा येण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. प्राण्यांच्या मानसिक आणि बौद्धिक क्षमतेवर होणारा हा परिणाम संपूर्ण परिसंस्थेला धोक्यात आणू शकतो. जर मधमाश्यांसारखे कीटक उष्णतेमुळे कोणत्या फुलांवर बसायचे हेच विसरले, तर शेती पिकांचे आणि जंगली वनस्पतींचे मोठे नुकसान होईल. जर पक्ष्यांना अन्न शोधणे कठीण झाले, तर त्यांच्या पिल्लांना अन्न मिळणार नाही आणि ती दगावतील.