वॉशिंग्टन : अनेक लोकांना उतारवयात होणारा मेंदूचा असाध्य विकार म्हणजे अल्झायमर. स्मृतिभ्रंशाच्या या आजारावर सध्या कोणताही रामबाण उपाय नाही. मात्र त्याची लक्षणे कमी करण्यासाठी काय केले जाऊ शकते याबाबत वेळोवेळी संशोधन केले जाते. आता संशोधकांनी म्हटले आहे की ठराविक अंतरानंतर केलेला उपवास अल्झायमरच्या रुग्णांना लाभदायक ठरू शकतो.
'अल्झायमर' हा असा आजार आहे ज्यामध्ये लोक अनेक गोष्टी विसरून जातात. अगदी जवळच्या लोकांनाही ते ओळखू शकत नाहीत. त्यांची निर्णयक्षमताही बाधित होते तसेच बोलतानाही त्यांना अडथळे येतात. याबाबत संशोधकांनी उंदरांवर काही प्रयोग करून पाहिले. कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीतील सॅन दियागो स्कूल ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी केलेल्या या प्रयोगांमध्ये असे दिसून आले की अल्झायर रोगामध्ये दिसणारी सकेंडियन बिघाड दूर करता येऊ शकतो. 'सेल मेटाबॉलिझम' या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की ज्या उंदरांना ठराविक अंतरानंतर भोजन देण्यात आले त्यांच्या स्मृतीमध्ये सुधारणा झाल्याचे दिसून आले. मेंदूमधील 'अमाइलॉईड प्रोटीन'चा संचय कमी झाला.
सॅन दियागो स्कूल ऑफ मेडिसिनमधील न्यूरोसायन्सेज विभागातील प्रा. पाउला डेसप्लेट्स यांनी सांगितले की अनेक वर्षे आम्ही मानत आलो की अल्झायमरने पिडीत लोकांमध्ये दिसणारा सकेंडियन बिघाड न्यूरो डिजनरेशनचा परिणाम आहे. मात्र आता आम्हाला दिसून आले की सकेंडियन बिघाड अल्झायमर रोगाच्या मुख्य कारणांपैकी एक असू शकतो. आम्ही प्रयोगावेळी उंदरांना प्रत्येक दिवशी सहा तासांच्या अंतराने खाण्यास दिले. माणसासाठी याचा अर्थ प्रत्येक दिवशी चौदा तासांचा उपवास करणे असा होतो. ज्या उंदरांवर हे प्रयोग केले ते रात्री कमी सक्रिय होते आणि अधिक झोप घेत होते. त्यांच्या झोपेतही कमी व्यत्यय आले. त्यांच्या स्मरणशक्तीत सुधारणा झाल्याचे दिसून आले.