रांची : काही गावांची स्वतःची अशी काही खासियत असते. संस्कृत बोलणारे गाव, जुळ्यांचे गाव, झोपाळूंचे गाव, एनआरआय लोकांचे गाव अशी गावं पाहायला मिळतात. आपल्याकडे काही गावातील लोक हे देशाच्या सेवेत असतात. त्या गावातील अनेक जण एक तर लष्करात नाही, तर पोलिस दलात असतात. एखादं गावातून प्रशासकीय अधिकारी बाहेर पडतात. पण, एक गाव तर जणू ‘रेल्वेपूर’ आहे. हे रेल्वेचे गाव आहे. कारण, या गावाची लोकसंख्या अवघी 1200 इतकी आहे; पण रेल्वेत काम करणार्यांची संख्या 200 इतकी आहे. या गावातील प्रत्येक कुटुंबातील कोणी ना कोणी रेल्वेत कर्मचारी आहे.
झारखंड राज्यातील बोकारो जिल्ह्यात माचाटांड - आलुवारा गावातील घरटी कोणी ना कोणी रेल्वे विभागात आहे. या गावाची लोकसंख्या अवघी 1200 इतकी आहे. मात्र, 200 लोकांहून अधिक जण रेल्वेत कर्मचारी आहे. काही कुटुंबातील तर पाच-सहा सदस्य रेल्वेत नोकरीला आहेत. रतनलाल महतो यांच्या कुटुंबातील 6 सदस्य रेल्वेत आहेत. रतनलाल आणि त्यांचे तीन भाऊ शोभाराम महतो, जोधाराम महतो आणि श्रीपति महतो रेल्वेत आहेत.
श्रीपति महतो यांची दोन मुलं सुभाष आणि कन्हाई हे दोघे पण रेल्वेत कर्मचारी आहेत. तर खेदुराम महतो यांच्या घरातील पाच सदस्य रेल्वेत कर्मचारी आहेत. त्यांचे दोन मुलं, त्यांचे दोन नातू, बहिणीचा मुलगा हे सर्व रेल्वेत कर्मचारी आहेत. तर त्यांच्या भावाच्या कुटुंबातील सदस्य पण रेल्वेत नोकरीला आहेत. या गावातील मुलगा, वडील, आजोबा, बहीण-भाऊ रेल्वेत कर्मचारी आहेत. विशेष म्हणजे, देशातील विविध भागातील रेल्वे विभागात ते कार्यरत आहेत.
भाऊ-भाऊ नोकरीत असलेली अनेक कुटुंबं या गट ग्रामपंचायतीमध्ये आहेत. तर तीन पिढ्यासुद्धा रेल्वेत असणारी कुटुंब या गावात आहेत. या गावातील काही रेल्वे कर्मचारी सेवा निवृत्त झाले आहेत. ते इतर ठिकाणी स्थायिक झाले असले, तरी त्यांचा वर्षातील मोठा काळ याच गावात जातो. त्यातील काही जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण सेवानिवृत्तीवर शेती घेऊन ती कसत आहेत. या गावातील नागरिकांना रेल्वेकडून अनेक सोयी-सुविधा मिळतात.