भुवनेश्वर : ओडिशामधील जंगलातून समोर आलेल्या एका घटनेने दाखवून दिले की, योग्य वेळी योग्य ज्ञानाचा वापर केला, तर अशक्य वाटणारी गोष्टही शक्य होऊ शकते. येथे एक हत्ती तब्बल 30 फूट खोल विहिरीत पडला होता. विहीर खूप खोल आणि अरुंद असल्यामुळे तसेच हत्तीचे वजन प्रचंड असल्यामुळे क्रेन किंवा दोरीच्या मदतीने त्याला बाहेर काढणे अत्यंत कठीण आणि धोकादायक ठरत होते. मात्र, हार न मानता वन विभागाच्या अधिकार्यांनी शाळेत शिकलेल्या ‘आर्किमिडीजचा सिद्धांत’ या वैज्ञानिक तत्त्वाचा वापर करून हत्तीचा जीव वाचवण्याचा निर्णय घेतला.
अधिकार्यांनी विहिरीजवळ पंप बसवून त्यात वेगाने पाणी भरण्यास सुरुवात केली. विहीर हळूहळू पाण्याने भरत गेली तसा हत्ती वरच्या दिशेने ढकलला जाऊ लागला. यामुळे तो हत्ती हळूहळू पाण्यावर तरंगत वर येऊ लागला. हा प्रसंग एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नव्हता. विज्ञानातील एका साध्या सिद्धांतामुळे एवढ्या मोठ्या प्राण्याचा जीव वाचवणे शक्य झाले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, वन विभागाच्या अधिकार्यांच्या हुशारीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. हजारो वर्षांपूर्वी ग्रीक वैज्ञानिक आर्किमिडिज यांनी हा सिद्धांत मांडला होता.
सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, जेव्हा एखादी वस्तू पाण्यात टाकली जाते तेव्हा पाणी त्या वस्तूवर वरच्या दिशेने एक बल लावते. या बलाला ‘उत्प्लावन बल’ म्हणतात. यामुळेच पाण्यात कोणतीही जड वस्तू तुलनेने हलकी वाटते. या घटनेचा उपयोग करूनच वन अधिकार्यांनी हत्तीचा जीव वाचवला. साधारणपणे अशा रेस्क्यू ऑपरेशनमध्ये प्राण्यांना दुखापत होण्याचा किंवा ते अत्यंत तणावात जाण्याचा धोका असतो. मात्र, या वैज्ञानिक पद्धतीमुळे हत्तीला कोणतीही शारीरिक इजा झाली नाही. पाण्याने जणू सुरक्षित कुशनसारखे काम करत त्याला वर उचलले. या घटनेमुळे हे स्पष्ट झाले की, विज्ञान केवळ प्रयोगशाळेत मर्यादित नसते. योग्य वेळी योग्य विचार आणि ज्ञानाचा वापर केला, तर मोठ्या संकटांवरही उपाय शोधता येतो. वन अधिकार्यांच्या शांततेमुळे एका निरपराध प्राण्याचा जीव वाचवण्यात यश आले.