Health benefits of salad | जेवणापूर्वी सलाड खाणे लाभदायक Pudhari File Photo
विश्वसंचार

Health benefits of salad | जेवणापूर्वी सलाड खाणे लाभदायक

पुढारी वृत्तसेवा

आपण अनेकदा जेवताना सलाड सोबत घेतो किंवा भूक लागल्यावर खातो. पण, तुम्हाला माहीत आहे का, अनेक आरोग्य तज्ज्ञ जेवणापूर्वी, विशेषतः दुपारच्या जेवणाआधी सलाड खाण्याचा सल्ला देतात? ही एक चांगली सवय आहे, कारण याचे अनेक फायदे आहेत. यामुळे पचन सुधारते, भूक नियंत्रणात राहते आणि दिवसभर ऊर्जा टिकून राहते. दुपारच्या जेवणापूर्वी सलाड खाण्याचे 5 मोठे फायदे आहेत, ते असे...

भूक नियंत्रणात राहते आणि वजन कमी होते

जेव्हा तुम्ही जेवणाची सुरुवात सलाडने करता, तेव्हा तुमच्या पोटात भरपूर फायबर जाते. भाज्यांमध्ये असलेल्या फायबरमुळे तुमचे पोट लवकर भरते. यामुळे मुख्य जेवण करताना तुम्ही नकळत कमी खाता. अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूटस् ऑफ हेल्थ ( NIH) ने केलेल्या संशोधनानुसार, जेवणापूर्वी फायबरने समृद्ध पदार्थ खाल्ल्यास एकूण कॅलरीचे सेवन कमी होते, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

रक्तातील साखर नियंत्रणात राहते

जड जेवण किंवा जास्त कार्बोहायड्रेटस् असलेले पदार्थ खाण्याआधी सलाड खाल्ल्याने शरीरातील स्टार्च आणि साखरेचे पचन हळू होते. यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही. परिणामी, दुपारच्या वेळी येणारी सुस्ती किंवा आळस टाळता येतो. ‘जर्नल ऑफ द अमेरिकन डायटेटिक असोसिएशन’मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, जेवणापूर्वी भाज्या खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी सुधारते, विशेषतः ज्यांना इन्सुलिन रेझिस्टन्सचा त्रास आहे, त्यांच्यासाठी हे खूप फायदेशीर आहे.

शरीराला अधिक पोषक तत्त्वे मिळतात

जेवणाच्या सुरुवातीला भाज्या खाल्ल्याने शरीराला आवश्यक असलेले जीवनसत्त्वे आणि खनिजे शोषून घेता येतात. पालकसारख्या पालेभाजीमध्ये व्हिटॅमिन K, व्हिटॅमिन C आणि अँटिऑक्सिडंटस् भरपूर प्रमाणात असतात. ही पोषक तत्त्वे हृदय, रोगप्रतिकारशक्ती आणि निरोगी त्वचेसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. जड पदार्थांपूर्वी भाज्या खाल्ल्याने शरीर या पोषक तत्त्वांना प्राधान्याने शोषून घेते.

पचनक्रिया सुधारते

कच्च्या भाज्यांमध्ये नैसर्गिक एंजाइम आणि फायबर असतात, जे पचनासाठी खूप महत्त्वाचे आहेत. यामुळे तुमच्या पोटाला बाकीचे जेवण पचवण्यासाठी एक चांगली सुरुवात मिळते. परिणामी, जेवणानंतर पोट फुगणे किंवा अस्वस्थ वाटणे, अशा समस्या कमी होतात. फायबरयुक्त पदार्थांचे नियमित सेवन केल्यास आतड्यांचे आरोग्य चांगले राहते आणि पचनक्रिया सुरळीत चालते.

शरीर हायड्रेटेड राहते, विषारी पदार्थ बाहेर पडतात

सलाडमधील काकडी, लेट्युस आणि सेलेरी यांसारख्या अनेक घटकांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. जेवणापूर्वी हे पदार्थ खाल्ल्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते आणि शरीरातील विषारी पदार्थ नैसर्गिकरित्या बाहेर पडतात. यामुळे तुम्ही दिवसभर ताजेतवाने आणि उत्साही राहता. अन्नातून मिळणारे पाणी किडनी आणि यकृताच्या कार्यासाठी देखील महत्त्वाचे आहे. नियमितपणे अशा भाज्या खाल्ल्यास त्वचा निरोगी राहते आणि थकवा कमी होतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT