लंडन : सुपरमार्केटमध्ये गेल्यावर भाज्या, फळांच्या नीट रचलेल्या रांगा आणि फ्रीजमध्ये ठेवलेले पदार्थ पाहून सर्व काही सुरळीत सुरू आहे, असे वाटते. परंतु, हे चित्र फसवे असू शकते. बि—टनसह जगभरातील अन्नपुरवठा साखळी सध्या एका अद़ृश्य, पण गंभीर संकटाचा सामना करत आहे, ते म्हणजे ‘डिजिटल परावलंबित्व’.
आजच्या काळात अन्नपुरवठा साखळी पूर्णपणे डेटाबेस, प्लॅटफॉर्म आणि स्वयंचलित प्रणालींवर अवलंबून आहे. जर एखाद्या डिजिटल सिस्टीमने मालाची पुष्टी केली नाही, तर ते अन्न बाजारात विकले जाऊ शकत नाही, त्याचा विमा उतरवता येत नाही किंवा त्याचे कायदेशीर वितरणही करता येत नाही. सोप्या भाषेत सांगायचे, तर जे अन्न डिजिटल प्रणालीला ‘दिसत’ नाही, ते प्रत्यक्षात उपलब्ध असूनही निरुपयोगी ठरते.
सायबर हल्ले : अलीकडेच अमेरिकेतील मोठ्या ग्रोसरी चेनवर झालेल्या सायबर हल्ल्यांमुळे ऑनलाईन ऑर्डरिंग सिस्टीम कोलमडली होती. प्रत्यक्ष साठा उपलब्ध असूनही केवळ डिजिटल यंत्रणा बंद पडल्याने वितरणास विलंब झाला.
मॅन्युअल बॅकअपचा अभाव : कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी अनेक कंपन्यांनी मानवी हस्तक्षेपाचे पर्याय काढून टाकले आहेत.
अस्पष्ट निर्णय प्रक्रिया : महत्त्वाचे निर्णय आता ‘एआय’ आणि अल्गोरिदमद्वारे घेतले जातात, जे अनेकदा मानवी समजण्यापलीकडे असतात. शेतीपासून ते वितरणापर्यंत आता ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ चा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. मागणीचा अंदाज वर्तवणे, पेरणीचे नियोजन करणे आणि इन्व्हेंटरी मॅनेजमेंटसाठी या साधनांचा वापर केला जातो. ब्रिटनमधील अन्न प्रणालीच्या प्रत्येक टप्प्यावर ही साधने आता घट्ट रुजली आहेत. मात्र, याचे गंभीर धोकेही समोर येत आहेत. जेव्हा अन्न वितरणाचे निर्णय सॉफ्टवेअरच्या नियमांवर सोपवले जातात, तेव्हा मानवी निर्णयाचे महत्त्व कमी होते. वेळेची आणि पैशांची बचत करण्यासाठी व्यवसाय ऑटोमेशनला प्राधान्य देत आहेत, ज्यामुळे अन्नपुरवठ्यावर अशा यंत्रणांचे नियंत्रण आले आहे, ज्यांना लोक प्रश्न विचारू शकत नाहीत किंवा त्यांचे निर्णय बदलू शकत नाहीत.