बीजिंग: चीन सध्या 83 मैल म्हणजेच सुमारे 133 कि.मी. लांबीच्या ‘पिंगलू कालव्याचे’ काम वेगाने पूर्ण करत आहे. हा जलमार्ग चीनच्या नैऋत्येकडील अंतर्गत नद्यांना थेट आंतरराष्ट्रीय सागरी मार्गांशी जोडणार आहे. या महाकाय प्रकल्पाच्या व्याप्तीमुळे सध्या संपूर्ण जगाचे लक्ष याकडे लागले आहे.
या प्रकल्पाचे उद्दिष्ट अत्यंत साधे पण आव्हानात्मक आहे : मोठ्या मालवाहू जहाजांना देशाच्या अंतर्गत भागातून थेट किनारपट्टीवर पोहोचवणे, जेणेकरून त्यांना लांबचा वळसा घालावा लागणार नाही. वेळेची बचत : सध्या या भागातील माल लांबच्या मार्गाने ग्वांगडोंग प्रांतातून समुद्रात जातो. पिंगलू कालव्यामुळे हा प्रवास सुमारे 348 मैलांनी (560 कि.मी.) कमी होईल. खर्चात मोठी कपात : या नवीन जलमार्गामुळे वाहतूक खर्चात दरवर्षी सुमारे 5.2 अब्ज युआन (सुमारे 750 दशलक्ष डॉलर्स) बचत होण्याचा अंदाज आहे. किमतीवर परिणाम : वाहतूक खर्च कमी झाल्यामुळे कारखान्यांपासून बंदरांपर्यंत आणि शेवटी ग््रााहकांच्या हातात पडणाऱ्या वस्तूंच्या किमती कमी होण्यास मदत होईल. पिंगलू कालवा गुआंग्शी प्रांतातील नाननिंग भागातून सुरू होतो आणि किनजियांग नदीचा पाठलाग करत दक्षिणेकडे बेइबू आखातापर्यंत जातो. हा कालवा कार्यान्वित झाल्यावर अंतर्गत नद्यांमधील वाहतूक थेट सागरी बंदरांशी जोडली जाईल. चिनी अधिकाऱ्यांच्या मते, हा कालवा ‘न्यू इंटरनॅशनल लँड-सी ट्रेड कॉरिडॉर’चा मुख्य भाग आहे. यामुळे ‘रिव्हर-सी इंटरमोडल ट्रान्सपोर्ट’ (नदी-समुद्र आंतर-वाहतूक) शक्य होईल, ज्याचा अर्थ असा की, एकाच जहाजाद्वारे किंवा समन्वित जहाजांच्या ताफ्याद्वारे मालवाहतूक कमीत कमी वेळेत आणि ट्रकच्या वापराशिवाय पूर्ण करता येईल. हा प्रकल्प 2026 च्या उत्तरार्धात पूर्ण होण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.