वॉशिंग्टन : सूर्यावरून निघणाऱ्या शक्तिशाली ज्वाला (सोलर फ्लेअर्स) सहसा पृथ्वीच्या वातावरणात अडथळा निर्माण करतात किंवा धुवीय भागांत सुंदर ‘ऑरोरा’ तयार करतात. मात्र, आता एका नवीन संशोधनाने खळबळजनक शक्यता वर्तवली आहे. या सौर ऊर्जेच्या उद्रेकाचा संबंध थेट पृथ्वीवरील भूकंपांशी असू शकतो.
‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ प्लाझ्मा एन्व्हायर्नमेंटल सायन्स अँड टेक्नॉलॉजी’मध्ये 3 फेबुवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार, अंतराळातील हवामानाचा परिणाम पृथ्वीच्या भूगर्भातील हालचालींवर होऊ शकतो. जेव्हा एखादी सौर ज्वाला पृथ्वीच्या दिशेने येते, तेव्हा ती पृथ्वीच्या ‘आयनोस्फिअर’मधील प्रभारित कणांची पुनर्रचना करते. आयनोस्फिअर हा पृथ्वीच्या वरच्या वातावरणाचा असा भाग आहे, जो विद्युत प्रभारित वायूंनी भरलेला असतो. संशोधकांचे म्हणणे आहे की, या बदलांमुळे पृथ्वीच्या कवचातील विद्युत बलामध्ये सूक्ष्म बदल होऊ शकतात.
यामुळे ज्या ठिकाणी ‘फॉल्ट लाइन्स’ (तडे किंवा भेगा) आहेत, तिथली स्थिरता बिघडून भूकंप होण्याची प्रक्रिया वेगवान होऊ शकते. या संशोधनात पृथ्वीचे कवच आणि आयनोस्फिअर (जे पृथ्वीपासून 402 किमी उंचीवर आहे) यांना एका ‘जायंट लीकी बॅटरी’च्या दोन टोकांप्रमाणे मानले गेले आहे. आपल्या पृथ्वीच्या कवचात नैसर्गिकरित्या निर्माण झालेली वीज खेळत असते. भूगर्भातील भेगांमध्ये अतिउष्ण आणि दाबाखाली असलेले पाणी असते. हे पाणी द्रव किंवा वायू रूपात नसून ‘सुपरक्रिटिकल फ्लुइड’ अवस्थेत असते, ज्यात मोठ्या प्रमाणात आयन असतात. यामुळे या भेगा एका ‘कॅपेसिटर’प्रमाणे (ऊर्जा साठवणारे साधन) काम करतात.
संशोधकांनी एक मॉडेल तयार केले आहे, ज्यानुसार भूगर्भातील हा ‘कॅपेसिटर’ आणि आकाशातील ‘आयनोस्फिअर’ एका विद्युत क्षेत्राद्वारे एकमेकांशी जोडलेले आहेत. हा दावा अत्यंत रंजक असला, तरी अनेक वैज्ञानिकांनी यावर शंका व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, 1. हे मॉडेल अत्यंत साधे आहे आणि प्रत्यक्ष पृथ्वीची भौगोलिक रचना खूप गुंतागुंतीची असते. 2. जमिनीची रचना या विद्युत परिणामाला इतक्या मोठ्या प्रमाणात शोषून घेऊ शकते की, त्याचा भूकंपावर होणारा परिणाम नगण्य असू शकतो.