व्हिएन्ना : मानवी मेंदू हा जन्मत: कोरी पाटी असतो की अनुभवातून तो विकसित होतो, या जुन्या प्रश्नाचे उत्तर शास्त्रज्ञांना सापडले आहे. उंदरांवर केलेल्या एका नवीन संशोधनानुसार, मेंदूचे स्मृती केंद्र (मेमरी सेंटर) जन्मानंतर शून्यातून तयार होत नाही, तर ते आधीच जोडणी झालेल्या (प्रीवायर्ड) स्थितीत असते.
‘नेचर कम्युनिकेशन्स’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेले हे संशोधन ‘हिप्पोकॅम्पस’ या मेंदूतील महत्त्वाच्या भागावर आधारित आहे. हा भाग स्मृती तयार करण्यासाठी आणि साठवण्यासाठी अत्यंत आवश्यक असतो. संशोधकांनी हिप्पोकॅम्पसमधील ‘CA3' (Cornu Ammonis 3) या क्षेत्राचा प्रामुख्याने अभ्यास केला, जो आठवणी साठवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. न्युरोसायन्समध्ये दीर्घकाळापासून असे मानले जात होते की, मेंदू अनुभवांतून नवीन कनेक्शन जोडत जातो. मात्र, या अभ्यासाने एक वेगळाच पैलू मांडला आहे.
संशोधकांनी उंदरांच्या जन्मानंतरचे, तारुण्यातील आणि प्रौढावस्थेतील मेंदूच्या उतींचा अभ्यास केला. संशोधनातील महत्त्वाचे निष्कर्ष : सुरुवातीची स्थिती : जन्मानंतर लगेचच हिप्पोकॅम्पस्मधील न्युरॉन्सचे जाळे अत्यंत दाट असते. यात अनेक न्युरॉन्स एकमेकांशी विस्कळीतपणे जोडलेले असतात. परिपक्वता : जसा मेंदू विकसित होतो, तशी ही विस्कळीत जोडणी कमी होऊन ती अधिक सुटसुटीत आणि संरचित होते. छाटणी : अनावश्यक जोडण्या काढून टाकण्याची ही प्रक्रिया जन्मानंतर लगेच सुरू होते आणि तारुण्यापर्यंत त्यात मोठी घट दिसून येते.