नवी दिल्ली : सध्याचे वातावरण म्हणजे कधी जोरदार पाऊस असल्याने हवेत गारवा जाणवतो, तर कधी मध्येच ऊन पडत आहे. या वातावरणाचा परिणाम हा नक्कीच तब्येतीवर होतो. अशा वातावरणामुळे रोगप्रतिकारक शक्तीदेखील कमकुवत होते. त्यामुळे ताप, सर्दी, खोकला असे आजार होत आहेत. तर बदलत्या वातावरणाचा परिणाम आरोग्यावर होऊ नये, यासाठी काही घरगुती उपाय करणेदेखील तेवढेच महत्त्वाचे आहे.
लोक हिवाळ्यात तसेच अशा बदलणार्या वातावरणात आरोग्यासाठी दररोज आल्याचा चहा, आले किंवा हळदीचे पाणी पितात. परंतु, आयुर्वेदात आणखी एक खास उपाय आहे. ज्यामुळे नक्कीच रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. तसेच, या आजारांपासून संरक्षण होते, असे तज्ज्ञ सांगतात. हा उपाय म्हणजे स्वयंपाकातील एक मसाला. तमालपत्र सर्वांच्या स्वयंपाकघरात असतो. त्यात औषधी गुणधर्म असतात. तमालपत्राचे पाणी पिल्याने शरीराला असंख्य फायदे मिळतात.
तमालपत्राचे पाणी अँटीऑक्सिडंटस् आणि जीवनसत्त्वांनी समृद्ध असते. ते प्यायल्याने शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढते आणि सर्दी आणि फ्लू टाळण्यास मदत होते. तमालपत्राचे पाणी पचनसंस्था मजबूत करते आणि गॅस, अपचन आणि पोटदुखीसारख्या समस्या कमी करण्यास मदत करते. तमालपत्र शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. नियमित सेवनाने रक्त शुद्ध होते आणि त्वचा स्वच्छ राहते.
तमालपत्रातील अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म हिवाळ्यात खोकला, सर्दी आणि घसा खवखवण्यापासून आराम देतात. तमालपत्र रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते, जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकते. तमालपत्राचे पाणी फायदेशीर असले, तरी त्याचे जास्त प्रमाणात सेवन करू नये. दिवसातून एक कप पुरेसे आहे. गर्भवती महिला आणि ज्यांना काही विशिष्ट अॅलर्जी किंवा आरोग्य समस्या आहेत, त्यांनी ते सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.